आरती रमेश कोचरेकर
कोकण आता सर्वांगानी बदलले आहे. मात्र विष्णू गांधी यांचे ‘इये फोंड्याचिये नगरी’ हे अलीकडेच प्रकाशित झालेले पुस्तक, पुढे गेलेल्या काळाची मागे राहिलेली पावले निरखण्याचा अकृत्रिम आनंद देते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले फोंडाघाट गाव ही लेखकाची जन्मभूमी. ७०- ८० वर्षांपूर्वी फोंडाघाट ही मोठी बाजारपेठ होती. तो समृद्ध काळ, मनावर ठसा उमटवून गेलेली माणसं, ती संस्कृती, चालीरीती, सणवार, नाटके, टुरिंग टॉकीज मधले सिनेमे हे सारे वाचताना लेखक वाचकांना बोट धरून त्या काळात घेऊन जातात.
कोकण, गोवा हा भाग नाटकवेडा, त्यामुळे उत्सवाच्या निमित्ताने, हौसेखातर नाटकं करणारी मंडळी तिथे होती. बापू शिरोडकर या उमद्या शिक्षकाने मुलांवर विद्योचे, वक्तृत्वाचे संस्कार करीत असतानाच नाटकाचेही संस्कार केले. त्यांनी बसवलेली नाटके पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली. लेखकाच्या बालपणीचा गावातील धुंवाधार पाऊस, झाडे, आंब्याचा मोसम हे सारेच या पुस्तकात भरभरून आले आहे. छोट्या मोठ्या गल्ल्या, रस्ते हेही जिवंत होऊन आपल्याला भेटतात. यातील घराजवळचा ‘तांबटाचा बोळ’ यावर लेखकाने एक अख्खं प्रकरण लिहिलं आहे. बोळाच्या डाव्या-उजव्या बाजूला असलेली दुकानं, त्याला लागून असलेल्या चाळी, तळमजल्याच्या पडवीत आपली हत्यारे घेऊन तांब्याच्या भांड्यांवर हातोडीचे लयबद्ध ठोके मारीत बसलेले तांबट, आजूबाजूच्या घरातील परसात असलेली आंबा- चिकूची झाडं, संध्याकाळी अंधार पडेपर्यंत बोळात सुरू असलेले मुलांचे नाना प्रकारचे खेळ, गळ्यातील घुंगरांच्या आवाजाने रस्ता जागवीत बाजाराकडे जाणाऱ्या बैलगाड्या आणि त्या बैलगाड्यांच्या पाठीमागील बासाला धरून काही अंतर लोंबकळण्याचा खेळ खेळणारी मुलं हे वर्णन वाचताना आपणही त्या बोळात भटकून येतो.
त्यावेळी अधूनमधून येणारी बाहेरच्या कंपन्यांची नाटकं आणि तंबूतील सिनेमा हीच करमणुकीची साधनं होती. फोंडेकरांसाठी स्वतंत्र टुरिंग टॉकीज असावी या विचारातून आबा गांधी (लेखकाचे वडील) यांनी ‘भारत टुरिंग टॉकीज’ या नावाने भागीदारीत कंपनी सुरू केली. त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेपर्यंत केलेली प्रत्येक जुळवाजुळव, उद्घाटनाचा दिवस, त्यावेळी लावलेला चंद्रलेखा हा भव्य सिनेमा, जाहिरातीसाठी रंगवलेले मोठे मोठे पोस्टर्स या वर्णनातील बारकावे वाचताना आपण थक्क होतो. त्यावेळी लेखकाचे वय असेल नऊ-दहा वर्षांचे. त्या वयात त्यांनी गॅसबत्तीच्या उजेडात ऑपरेटरच्या बाजूला बसून केबिनच्या खिडकीतून, अनेक सिनेमे अनेकदा पाहिलेत. त्यामुळे बहुतेक सिनेमातील संवाद त्यांना तोंडपाठ झाले होते. आपल्या गावाची सर्वांगाने ओळख करून दिल्यानंतर लेखक शेवटच्या एक-दोन प्रकरणात आपल्या कुटुंबाची, गावातील घराची, जिद्दी वडिलांची आणि सोशीक आईची आपल्याला ओळख करून देतात.
‘इये फोंड्याचिये नगरी’- विष्णू गांधी, शब्दांकन- संपदा वागळे, अनघा प्रकाशन, ठाणे</p>
पाने – २२६, किंमत- २५० रुपये.