खान्देशातील एका लहानशा गावातून प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून पुण्यात शिकायला आलेल्या मुक्ताच्या धडपडीची, नात्यांची, मैत्री आणि कष्ट-संघर्षाची गोष्ट म्हणजे ‘निळ्या डायरीची गोष्ट’ ही श्वेता सीमा विनोद यांची दुसरी कादंबरी होय. पुणे विद्यापीठातून एमए करणारी मुक्ता एमपीएससी स्पर्धा परीक्षेचीही तयारी करत असते. अधिकारी व्हायचं, आईवडिलांना चांगले दिवस दाखवायचे हे तिचं स्वप्न असतं. त्यामुळे दिवसरात्र अभ्यास एके अभ्यास करत असताना, विद्यापीठात तिला पूर्णत: वेगळ्या सामाजिक स्तरातले मित्रमैत्रिणी भेटतात. त्यांचा एक ग्रुप तयार होतो. या ग्रुपबरोबर केलेली मजा, त्यांच्यातले ताण, एकमेकांना मदत करण्याचे प्रसंग आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी केलेले प्रयत्न यांचं चित्रण कादंबरीत वाचायला मिळतं.
कादंबरीची भाषा आजच्या तरुणांची आहे. गोष्ट सांगण्याची पद्धत सहज, प्रवाही आणि ओघवती आहे. मुक्ताच्या मनातले विचार, तिने लिहिलेल्या डायरीतल्या काही गोष्टी, गावाकडच्या नदीचं वर्णन किंवा मित्रमैत्रिणींसोबतचे प्रसंग-घटना लेखिका सहज ठाशीव उभ्या करते. मधूनच येणारी खान्देशी बोली संपूर्ण कादंबरीला वेगळा पोत बहाल करते.
मुक्ताच्या नव्या ग्रुपमधले आदिती, कबीर यांसारखे तरुण पुण्यातल्या उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातले असतात. त्यामुळे मुक्ताला सतत आपण गावाकडून आलो आहोत, आपलं राहणं-भाषा त्यांच्यासारखी नाही, आर्थिकदृष्ट्याही आपण त्यांच्यासारखे नाहीत याचा न्यूनगंड वाटत राहतो. त्यामुळे आपण ग्रुपमध्ये असलो तरी ‘बाहेरचे’ आहोत की काय असं तिला वाटतं. दुसरीकडे, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याकरता दिवस-रात्र अभ्यास करणं, आर्थिक ओढाताण यांचाही मानसिक ताण तिच्यावर असतो. यात तिची होणारी ओढाताण, घरचे लग्नाबद्दलचे प्रश्न, त्यामुळे होणारी चिडचिड, पहिले प्रथमेश आणि नंतर कबीर यांच्याशी झालेल्या रिलेशनशिप्समधले ताणेबाणे तसंच मित्र अन्या आणि मुक्ता यांच्यातली निखळ मैत्री हे सारं मुक्ता आपल्याला ‘तिच्या’ नजरेतून प्रांजळपणे कथन करते.
कादंबरीमध्ये काही घटना किंवा प्रसंग आवर्जून उल्लेख करण्याजोगे आहेत. उदाहरणार्थ, सगळा ग्रुप मुक्ताला घेऊन गडावर ट्रेकला जात असतानाच, अचानक मुक्ताला पिरेड सुरू होतात. त्यामुळे पाठ, पोट प्रचंड दुखायला लागल्याने ती पुण्याला परतायचा निर्णय घेते. त्या वेळी मित्र कबीर तिला बाइकवरून पुण्यात आणतो. तिची काळजी घेतो. त्याची आई गायनॅक असल्याचं सांगून तिला डॉक्टरांकडे जायला सांगतो. मुक्ताला एक मुलगा पाळी या विषयावर इतकं मोकळं बोलतोय, सहज पाहतोय हे नवीनच असतं. त्यामुळे ती जरा गोंधळते, बिचकते. अबोल कबीर आणि तिच्यात तसं म्हणायला फार मैत्री झालेली नसते. तिला तो किंमतच देत नाही असं तिला वाटत असतं, पण खरं तर ती त्याला आवडत असते हे तिला नंतर कळतं. त्यामुळे त्यांच्यात अवघडलेपणा येतो किंवा प्रेम असल्याचं सांगून, सहजीवनाच्या आणाभाका घेऊन अधिकारी झाल्यावर मात्र काही न सांगता प्रमथेश दुसऱ्या मुलीशी साखरपुडा ठरवून मोकळा झालाय, हे कळल्यावर मुक्ताला मोठा मानसिक धक्का बसतो. त्यातून सावरण्याकरता ती स्वत:ला ज्या प्रकारे तयार करते, घरची परिस्थिती पाहता आपल्याला अभ्यास करून अधिकारी होणं कसं गरजेचं आहे हे समजावते आणि तिचे मित्रही तिला ज्या पद्धतीने आधार देतात, हे हृद्या आणि सच्चं वाटतं.
ही कादंबरी प्रामुख्याने दोन अक्षांवर तोललेली आहे. पहिला अक्ष आहे तो संघर्ष करत अधिकारी होण्याची स्वप्न पाहणाऱ्या, जिद्दी मुक्ता आणि तिच्यासारख्याच तिच्या हॉस्टेलमधल्या मुलींचा. तर दुसरा अक्ष आहे, सुस्थित शहरी आदिती, कबीर यांसारख्या तरुणांचा. या दोन अक्षांमध्ये सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक दरी बरीच आहे, या दरीचं चित्रण मुक्ताच्या या गोष्टीमधून उभं राहतं. हे दोन अक्ष एकत्र आले तर काय घडू शकतं, याच्या शक्यता ही कादंबरी शोधते. ही दरी हे वास्तव आहे, त्यामुळे ती दाखवणं तर महत्त्वाचं आहेच, पण दोन्ही बाजूंकडले काही समंजस तरुण कधी एकमेकांना समजून घेत, कधी चुकतमाकत, दुखवत, मग सॉरी म्हणत, मदत करत एकमेकांशी काहीतरी नातं बांधायचा प्रयत्न करतात, त्यातून काहीतरी नवं घडू शकतं अशी वाट दाखवतात, हादेखील या कादंबरीचा विशेष आहे. तसंच मुक्ताची ही गोष्ट स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि अधिकारी होण्याची स्वप्न पाहणाऱ्या मुला-मुलींचीही कथा आहे.
मराठीत आजवर कॉलेज जीवनाबद्दलच्या किंवा कॉलेजमधील तरुणाईबद्दलच्या बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत, पण एका तरुणीच्या इच्छा-आकांक्षांची, सुखदु:खाची, तिच्या स्वातंत्र्याची, जिद्दीची आणि आपली आपण वाट शोधण्याची ही मुक्ताची गोष्ट वेगळी ठरते. कारण आधीच्या बहुतांश कादंबऱ्यांचा प्रोटॅगनिस्ट हा तरुण मुलगा आहे. तो त्याच्या ‘पुरुषी’ दृष्टिकोनातून जगाकडे पाहतो आणि त्याचे अर्थ लावायचा प्रयत्न करतो. पण या कादंबरीची प्रोटॅगनिस्ट आजची, विचारी, सजग तरुणी आहे. ती या जगाची चिकित्सा करते, त्यावर भाष्य करते, आर्थिक दरीबद्दल बोलते, सामाजिक समस्या सांगते, स्त्री-स्वातंत्र्य, समता याबद्दल हिरिरीने बोलते, प्रसंगी कृतीही करते. ती चिडते, रागावते, रडते, पण ‘सिनिकल’ होत नाही किंवा कोरडी, भावनाहीन राहत नाही. तिला नवं शोधण्याची आस आहे, तिची त्यासाठी धडपड चालू आहे. एका अर्थाने, तिचा हा शोध सर्जनशील आहे आणि तो आजचा, ताजा आणि समकालीन आहे.
‘निळ्या डायरीची गोष्ट’, श्वेता सीमा विनोद, मधुश्री पब्लिकेशन, पाने- २१६, किंमत- २५० रुपये.
sakhadeopranav@gmail.com