मकरंद जोशी
प्रवासवर्णन हा असा साहित्य प्रकार आहे, जो वाचकांसाठी त्यांनी न पाहिलेल्या जगाकडे बघण्याची, त्याची झलक पाहण्याची एक खिडकी ठरतो. मात्र ही खिडकी ज्या लेखकाने प्रवासवर्णन लिहिलं आहे, त्याच्या नजरेतून त्या देशाचं- प्रदेशाचं दर्शन घडवत असते. त्यामुळे प्रवासवर्णन लिहिणारा लेखक किती बहुश्रुत, बहुआयामी आणि स्वत: समृद्ध आहे त्यावर त्या प्रवासवर्णनाची रंगत ठरत असते. साहजिकच मराठी साहित्यात प्रवासवर्णनांची कमी नसली तरी काही ठरावीक लेखकांनी लिहिलेली प्रवासवर्णने (अगदी चाळीस-पन्नास वर्षे उलटून गेली तरीही!) लोकप्रियतेच्या यादीत अग्रक्रमावर आढळतात. जेव्हा युरोप किंवा अमेरिका ही खरोखरच ‘अपूर्वाई’ होती तेव्हा तिकडच्या प्रवासवर्णनांचं कौतुक वाचकांना असणं स्वाभाविकच होतं. मात्र आता परिस्थिती तशी नाही, त्यात समाजमाध्यमं-गूगलमुळे तर जगाच्या कानाकोपऱ्यातील देशांविषयी (नको इतकी!) माहिती घरबसल्या उपलब्ध असल्यामुळे, जर लेखकाची शैलीच अतिशय आकर्षक असेल आणि ज्या भागाचे वर्णन आहे तो प्रदेशच खरोखरच अनोखा असेल तरच ते प्रवासवर्णन वाचकांना गुंतवून ठेवू शकेल. या दोन्ही निकषांवर पुरेपूर उतरणारं एक वाचनीय, माहितीपूर्ण आणि वेगळ्या जगाची ओळख करून देणारं प्रवासवर्णन म्हणजे मिलिंद बोकील लिखित ‘निळे आकाश हिरवी धरती’. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित करण्यात आलेलं हे प्रवास वर्णन रूढ प्रवासवर्णनांच्या साच्यात अनेक अर्थांनी बसत नाही. आता ज्यांनी मिलिंद बोकील यांचं ‘क्षितिजापारच्या संस्कृती’ हे पुस्तक वाचलेलं असेल त्यांना बोकील यांच्या प्रवासवर्णनांची हटके शैली परिचित असेलच. त्यामुळे ज्या देशाचं नाव आपण फक्त इतिहास भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं आहे अशा ‘मंगोलिया’ या देशाची ओळख करून देणारं ‘निळे आकाश हिरवी धरती’ हे प्रवासवर्णन वाचकांना खरोखरच एका अनोख्या देशाचा, त्याच्या इतिहास- भूगोलाचा आणि त्यातून घडलेल्या तिथल्या लोकजीवनाचा वेधक परिचय करून देणारं ठरतं.
मंगोलिया म्हणजे पूर्व आशियातला असा देश- जो जगातला सर्वात विरळ लोकसंख्येचा स्वतंत्र देश म्हणून ओळखला जातो. रशिया आणि चीन या दोन मोठ्या (सगळ्याच अर्थांनी!) देशांच्या सापटीत हा देश वसलेला आहे. मंगोलिया म्हटल्यावर आठवतो तो ‘चेंगिजखान’, पण सर्वसाधारण माणसाची मंगोलियाची ओळख इथेच संपते. बरं हा देश काही नव्याने उदयाला आलेल्या ‘ऑफ बीट’ पर्यटनस्थळांपैकी नाही, मग मिलिंद बोकीलांना या देशाला भेट द्यावीशी का वाटली? तर जिज्ञासू वृत्तीच्या आणि समाजशास्त्राचे अभ्यासक असलेल्या बोकीलांचं लक्ष मंगोलियाकडे गेलं. कारण शतकानुशतकं हा देश पशुपालकांचा देश म्हणूनच ओळखला जातो. काळाच्या ओघात मंगोलियामधील समाजजीवनात, जीवनशैलीत फारसा फरक पडलेला नाही, त्यामुळेच या देशातलं समाजजीवन, लोकजीवन जवळून बघावं या इच्छेनं बोकीलांनी मंगोलिया वारी केली. खडकाळ, डोंगराळ भूभाग, उंचावरचा पठारी प्रदेश, अत्यंत प्रतिकूल हवामान, पावसाचं प्रमाण अगदीच कमी, त्यामुळे शेती हा या देशातला व्यवसाय होऊच शकत नाही. पिढ्यान् पिढ्या शेळ्या-मेंढ्यांचे कळप घेऊन फिरणारे पशुपालक आणि भटक्या जीवनशैलीतून घडलेला समाज असं मंगोलियाचं ढोबळ वर्णन होऊ शकतं. अशा देशातील पूर्वापार चालत आलेलं भटकं लोकजीवन आता काळाच्या रेट्यात बदलू लागलं आहे. या बदलत्या जीवनशैलीत स्त्रियांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी मिलिंद बोकील मंगोलियात गेले होते. साहजिकच ‘निळे आकाश हिरवी धरती’ या प्रवासवर्णनाचा बाज वेगळा आहे. एका संवेदनशील आणि जिज्ञासू-अभ्यासू समाजशास्त्रज्ञाच्या नजरेतून आपल्याला मंगोलियाचे दर्शन या पुस्तकात घडतं जे वाचकांसाठी जितकं रोचक आहे, तितकंच विचार करायला लावणारंही आहे.
शे-दोनशेपेक्षाही जास्त गुरे – प्रामुख्याने शेळ्या-मेंढ्या घेऊन रानोमाळ फिरणारे मंगोल पशुपालक, त्यांचे पारंपरिक ‘गीर’ (राहाण्याचे तंबू), धनुष्यबाणाचा त्यांचा पारंपरिक खेळ, मंगोल लोकांचं अश्वप्रेम, ‘उरुम’-‘आरुल’- ‘आरक’ असे दुधापासून बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ, ‘नाडम’ हा या देशाचा राष्ट्रीय उत्सव अशा अनेक गोष्टींचे तपशीलवार वर्णन लेखकाने केले असल्याने, मंगोल लोकजीवन वाचकांच्या डोळ्यांसमोर उभं राहातं. ऐतिहासिक सिल्क रुटवरचा हा भूभाग असल्याने चीनपासून ते युरोपपर्यंतशी झालेल्या संपर्कातून या देशावर धर्मापासून ते राज्यव्यवस्थेपर्यंत कसे कसे परिणाम होत गेले, चेंगिजखानला या देशाचा राष्ट्रपुरुष का मानतात?, बौद्ध धर्माचा प्रसार होण्याआधी या देशातले लोक कोणत्या धर्माला अनुसरत होते? सुमारे सत्तर वर्षे सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील मंगोलिया कसा होता? सोव्हिएत रशियाच्या अस्तानंतर नव्वदच्या दशकात मंगोलियात खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित झाल्यामुळे काय परिवर्तन घडलं, याची झलक या पुस्तकातून समोर येते.
पिढ्यान्पिढ्या आपले ३००-५००-८०० गाई- गुरांचे कळप घेऊन भटके आयुष्य जगणाऱ्या मंगोल लोकजीवनावर बदलत्या काळाचे पडसाद तीव्रपणे उमटताना दिसत आहेत. एका कुटुंबात किमान ६-७ भावंडे असल्यानं पूर्वी जवळचं पशुधन वाढवण्यावर भर असायचा, पण आता कुटुंबातील मोठी मुलं शहरात जाऊन शिकू लागली, तिथेच नोकरी करू लागली साहजिकच माळावरच्या कुटुंबांनी आपला पशुधनाचा पसारा आवरायला घेतल्याची चिन्हं लेखकाला पाहायला मिळाली. पारंपरिक सामग्रीने उभारलेल्या गीरच्या छपरावर डिश अॅन्टेना आणि दारात टोयोटा असा बाह्यरूपातला फरक आता हळूहळू या समाजाच्या अंतर्भागातही पोहोचू लागला आहे. लेखकाने काही मोजक्या कुटुंबांना भेट दिली. त्यातील एका कुटुंबात तर लेखक पूर्ण दिवस राहिला. या मुक्कामात ‘गीर’(तंबूतलं घर) उतरवण्यापासून ते रक्ताचा एक थेंबही न सांडता मेंढा मारण्याच्या पारंपरिक कौशल्यापर्यंत अनेक गोष्टी लेखकाने जवळून अनुभवल्या. या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटाच्या स्त्री-पुरुषांना भेटून, त्यांच्याशी चर्चा करून पशुपालन-त्यातील अडचणी-त्याचे अर्थकारण आकडेवारीसह समजून घेण्याचा लेखकाने प्रयत्न केला. त्यामुळेच आता जरी नव्या पिढीला शहरातील राहणीमानाचा किंवा तिथल्या स्थिर उत्पन्नाचा मोह होत असला तरी पशुपालकाचं उत्पन्न कितीतरी पटीत आजही जास्त आहे ही बाब लेखक अधोरेखित करताना दिसतो. या सगळ्या पाहणीमध्ये ‘मंगोलियातील पशुपालनाच्या व्यवसायात स्थित्यंतर होऊ घातले आहे आणि त्याच्या सूत्रधार मंगोलियन स्त्रिया आहेत’ हा निष्कर्ष लेखक नोंदवतो. या निष्कर्षामधील ‘बिटविन द लाइन्स’ असलेला अर्थही तो वाचकांना उलगडून दाखवतो. आपल्याकडच्या (भारतातील) भटक्या जाती-जमातींमध्ये स्त्रियांचे स्थान हे दुय्यम असतं, ग्रामीण-कृषीप्रधान समाजातही स्त्रिया पुरुषप्रधान व्यवस्थेच्या दडपणाखाली असतात, त्याउलट मंगोलियातील पशुपालकांच्या समाजात मात्र असा भेद आढळत नाही. असं का झालं असावं याचं लेखकाने केलेलं विश्लेषण मुळातूनच वाचण्यासारखं आहे.
या प्रवासवर्णनातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे मंगोलिया या देशात ‘मंगोलियन’ भाषा बोलली जाते, ही भाषा आपल्यासाठी अगदीच अपरिचित असल्याने या भाषेतले शब्द विशेषत: विशेषनामे आपल्यासाठी उच्चारायलाही कठीण अशी आहेत. पण लेखकाने परिश्रमपूर्वक या नावांचा अर्थ शोधून त्यांचे भारतीयीकरण करून दिल्याने त्या नावांविषयी वेगळीच आपुलकी वाटू लागते. उदाहरणार्थ, नारंजेरेल या नावातील नार म्हणजे सूर्य आणि जेरेल म्हणजे प्रकाश म्हणून नारंजेरेलचं ‘रविप्रकाश’ किंवा ‘एन्खी’ म्हणजे शांत म्हणून तिचे नाव ‘शांताबाई’ होऊ शकते असं लेखक सांगतो तेव्हा गंमत वाटते, खरी मजा येते. ‘आयुंबाट’ नावाच्या बाबतीत, ‘आयुं’ म्हणजे मंगोलियन भाषेत शहाणपण आणि बाट म्हणजे ‘अति’ हे कळल्यावर मराठीत या नावाचा होणारा अर्थ आठवतो. मंगोल लोकांच्या पारंपरिक धार्मिक समजुतींबद्दल लेखक जसं विस्तारानं लिहितो, त्याचप्रमाणे मंगोल लोकांच्या घोडेस्वारीच्या कौशल्यामागे तिथल्या घोड्यांची ठेवण कशी महत्त्वाची हेसुद्धा सांगतो.
समाजशास्त्राचा अभ्यासक म्हणून लेखक मंगोलियातील बदलत्या समाज जीवनाचा वेध घेत होता, मात्र त्याच्यातला संवेदनशील प्रतिभावंत अर्थातच जागा होता. त्यामुळेच मंगोलियातल्या हिरव्या कुरणांवरती पाठ टेकून पहुडल्यावर वरती दिसणारं निळंभोर आकाश पाहाताना लेखकाच्या मनात उमटणारे तरंग अतिशय तरलपणे तो व्यक्त करतो. एका अनोख्या, आपल्या क्षितिजाच्या पलीकडे असलेल्या भूभागातल्या लोकजीवनाची वेधक झलक अनुभवायची असेल हे प्रवासवर्णन अवश्य वाचावं.
‘निळे आकाश हिरवी धरती’,- मिलिंद बोकील, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,
पाने १७८, किंमत- ३०० रुपये.
makarandvj@gmail.com