१४ ऑक्टोबरच्या ‘लोकरंग’ मध्ये राजेंद्र येवलेकर यांचा ‘मधुघटचि रिकामे पडती घरी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखावरील प्रतिक्रिया..
२००६ पासून घटणारी मधमाश्यांची संख्या हा काळजीचा विषय आहे, याबाबत वाद नाही. कारण मधमाश्यांची संख्या घटत आहे ही वस्तुस्थिती आहे. मधमाश्या करीत असलेल्या परागीभवनामुळे सुमारे १/३ अन्न उत्पादन मिळते. काही उत्पन्ने तर संपूर्णपणे मधमाश्यांनी केलेल्या परागीभवनावर अवलंबून असतात, उदा. बदाम. परंतु लेखात या घटणाऱ्या संख्येला मोबाइल आणि त्यांचे टॉवर यांना सर्वस्वी जबाबदार धरले आहे ते मात्र विवाद्य आहे. त्याबद्दलची सर्वसामान्यपणे उपलब्ध असलेली शास्त्रीय माहिती काय आहे हे सांगण्यासाठी या लेखाचा प्रपंच.
मोबाइलमुळे माणसां-माणसांमधला संवाद वाढला असला तरी मोबाइल आणि त्यांच्या टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे मधमाश्यांच्या शरीरांतर्गत पेशी-पेशींमधील संवाद कोलमडला आहे. या विद्युत चुंबकीय लहरींमुळे मधमाश्यांची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होते, चुंबकीय लहरींमुळे त्या भ्रमिष्ट होऊन मार्ग चुकतात, त्यांचा अन्न कुठे आहे हे एकमेकांना सांगणारा नाच (वॅगल डान्स) चुकतो व परिणामी त्या अन्नापासून वंचित होतात, असे दावे लेखात केले आहेत. या दाव्यांच्या पुष्टय़र्थ काही व्यक्तींच्या अभ्यासाचा आधार घेतलेला आहे आणि पंजाब विद्यापीठातील संशोधनाचा दाखला दिला आहे.
पेशी-पेशींमधील संदेशवहन-संवाद विद्युत-रासायनिक क्रियांद्वारे चालते. विशिष्ट प्रथिने पेशी-आवरणावर पोचल्यावर पेशी-आवरणावरील विद्युतभार बदलतो आणि पेशी-आवरणावरील दरवाजे उघडतात आणि विशिष्ट रेणूच त्यातून आत प्रवेश करू शकतात. ते रेणू पेशींमध्ये गेल्यानंतर पेशींतर्गत पुढील प्रक्रिया घडतात. पेशींमधील हे संदेशवहन विद्युत-रासायनिक क्रियांद्वारे चालते. लेखात म्हटल्याप्रमाणे विद्युत-चुंबकीय क्रियांद्वारे चालत नाही. पेशी-आवरणावरील विद्युतभार आपण अचानक बदलू शकतो पण त्यासाठी बराच तीव्र शक्तीचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ हृदयक्रिया थांबल्यावर दिला जाणारा झटका ५० ते ३०० ज्युल्स इतका असतो. विजेचा झटका लागून माणूस चिकटतो तेव्हा त्याला किंवा २२० व्होल्टचा झटका बसलेला असतो आणि त्याचे स्नायू हालचाल करू न शकल्याने तो हात बाजूला काढू शकत नाही. एवढय़ा-तेवढय़ाने पेशींवरील विद्युतभार बदलला असता तर मोबाइल हातात धरवला नसता. वातावरणात इतर इतक्या विद्युत चुंबकीय लहरी असताना जगणेही मुश्कील झाले असते.
एमआरआय ही एक आधुनिक वैद्यकीय शास्त्रात रोगनिदानासाठी नेमाने वापरली जाणारी पद्धत आहे. माझ्या मते माणूस याहून अधिक क्षमतेच्या चुंबकीय क्षेत्रात कधीच शिरत नाही. इतक्या तीव्र चुंबकीय क्षेत्रात आपल्या मेंदू अथवा शरीराचा जो भाग अभ्यासाला जात आहे, त्यातील पेशींचे संदेशवहन पूर्णपणे बंद पडले पाहिजे होते. पण तसे होत नाही हे वास्तव आहे, मेंदूचा एमआरआय करताना आपण पूर्ण शुद्धीवर असतो, आपण भ्रमिष्टही होत नाही आणि काही विसरतही नाही. मेंदुपेशीतील संदेशवहन अगदी व्यवस्थित चालू राहते.
रोगप्रतिकारकशक्ती ही मोबाइलच्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे बाधित होते हेही खरे नाही. त्याचे कारण मोबाइलमध्ये आपण वापरीत असलेल्या विद्युत चुंबकीय लहरी यांची क्षीण क्षमता. यापेक्षा खूप अधिक विद्युत चुंबकीय लहरींशी सामना करावा लागला तर पेशीमधील प्रथिने विघटित होतात किंवा त्यांच्यातील डीएनए खराब होतो. अल्ट्रा-व्हायोलेट प्रकाशलहरींशी प्रदीर्घ सामना केल्यावरच त्वचेचा कर्करोग होतो किंवा क्ष-किरणांसारख्या अतिजहाल किरणांमुळे पेशीतील प्रथिने विघटित होतात आणि पेशी मरते किंवा प्रसंगी डीएनए विघटित होतो आणि पेशी कर्करोगग्रस्त होऊ शकते. (कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्याकरिता आपण रेडिओथेरपी वापरतो, परंतु याचबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की जितक्या सहजतेने कर्करोगाच्या पेशी आपण क्ष-किरणांनी मारतो तितक्या सहजतेने आजूबाजूच्या निरोगी पेशींच्या डीएनएचे नुकसान करून त्यात आपण कर्करोग निर्माण करीत नाही. असे जर असते तर आपण क्ष-किरणांचा वापर करून आपण कर्करोग बराच करू शकलो नसतो. ती थेरपी म्हणून वापरता आलीच नसती. आणि कमी तीव्रतेच्या क्ष-किरणांचा वापर रोगनिदानासाठीही करू शकलो नसतो.) असे असले तरी क्ष-किरणांपेक्षा कितीतरी क्षीण असे मोबाइलच्या विद्युत चुंबकीय लहरी आणि मेंदूचा कॅन्सर याचाही बादरायण संबंध जोडला जातो. वस्तुत: आपली रोगप्रतिकारकशक्ती दोन प्रकारची असते- एक जन्मजात आणि दुसरी प्रशिक्षित. आणि या दोन्ही पूर्णत: रासायनिक क्रियेने चालतात. जेव्हा बुरशी-विषाणूचे परचक्र येते तेव्हा संपूर्णत: रासायनिक क्रियेने ते परचक्र आहे हे ओळखले जाते. प्रशिक्षित रोगप्रतिकारकशक्ती रासायनिक क्रियेतून प्रत्येक विषाणू वेगळा ओळखते तर जन्मजात रोगप्रतिकारकशक्ती ही विषाणूंचे प्रथिन की शरीरांतर्गत प्रथिन अशा ठोकताळ्यांवर चालते. विद्युत चुंबकीय संदेशाद्वारे असे ओळखणे शक्य नाही. लेखात म्हटले आहे, त्याप्रमाणे पेशींमधील विद्युत चुंबकीय संदेशवहन कोलमडल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होणे म्हणूनच शक्य नाही.
मधमाश्यांचे झुलवा नृत्य (वॅगल डान्सचे लेखकाने केलेले आकर्षक भाषांतर)ही विद्युत चुंबकीय लहरींमुळे बिघडते, असा लेखकाचा दावा आहे. मधमाश्या तसेच पक्षीही चुंबकीय लहरींची दिशा पाहून मार्गक्रमण करीत असतात, असे पुढे लेखात म्हटले आहे. चुंबकीय लहरी त्या पाहतात कशा? कोणीही चुंबकीय लहरी पाहायच्या कशा? चुंबकाच्या प्रभाव क्षेत्रात जेव्हा आपण लोखंडाचा चुरा टाकायचो आणि शाळेत प्रयोग करायचो तेव्हा विकर्ष रेषा आपल्याला दिसायच्या. त्याशिवाय आपल्याला चुंबकीय क्षेत्र डोळ्याला दिसत नाही. तसे दिसत असते तर हा प्रयोग आपल्याला करावा लागला नसता.
मधमाश्यांच्या नृत्यावर उभे आयुष्य वेचून ५० वर्षांनंतर ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ एरिक फॉन फ्रिश यांनी त्याचे रहस्य शोधले. ते असे आहे. मधमाश्या इंग्रजी आडव्या आठ (किंवा मराठी ळ) या आकारात नृत्य करतात आणि ते करीत असताना पकडलेला वेग अन्नाच्या स्रोताचे अंतर दर्शवतो. जितका वेग अधिक तितके अंतर कमी असे व्यस्त प्रमाण असते. तर या आडव्या आठ अंकांच्या मधोमध उभ्या रेषेवरही त्या नाचतात. ही रेष पूर्व-पश्चिम अक्ष दाखवते. या रेषेवर जर खालून वर नाच असेल तर त्याचा अर्थ सूर्याकडे चाल करून आणि वरून खाली असेल तर सूर्याला मागे ठेवून. पोळे आणि सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेशी या सरळ रेषेतील नाचाने केलेल्या कोनाने अचूक दिशा दाखवली जाते. या प्रयोगात पुढे त्यांनी विजेचा दिवा लावून आणि पोळ्यापासून विविध अंतरावर आणि विविध दिशेला अन्नाचा स्रोत ठेवून वारंवार हे प्रयोग केले. या शोधासाठी ते नोबेलचे मानकरी झाले आणि हे संशोधन आता पाठय़पुस्तकातही समाविष्ट झालेले आहे. मधमाश्या या प्रकाशकिरणांच्या साहाय्याने दिशा ठरवीत असतात, चुंबकीय लहरींमुळे नव्हे. जेव्हा ढगाळ वातावरण असते तेव्हा त्यातून पुढे येणारे अतिनील किरणसुद्धा त्यांना यासाठी पुरतात. (कीटकांना अतिनील किरणांच्या साहाय्याने स्पष्ट दिसते) आणि अंधार असतो तेव्हा एकमेकांशी लगट करून त्या दिशा आणि अंतर समजून घेतात. असे असताना विद्युत चुंबकीय लहरी, त्यांची कंप्रता आणि मधमाश्या निर्माण करीत असलेल्या विद्युत चुंबकीय लहरी आणि त्यांची कंप्रता आणि त्यांच्यातील टकरीमुळे होणारा भ्रम हे कसे शक्य आहे?
चुंबकीय लहरी, विद्युत चुंबकीय लहरी यामुळे मधमाश्या मार्ग-भ्रमिष्ट होऊन अन्नापासून वंचित होतात आणि त्यांच्या वसाहतींची वासलात लागते, हे म्हणूनच पटणारे नाही.
मधमाश्यांच्या वसाहतींवर मोबाइलमध्ये वापरत असलेल्या विद्युत-चुंबकीय लहरींचा विपरीत परिणाम होत आहे, असे सांगणारे पहिले प्रयोग जर्मनी आणि स्वित्र्झलड येथून प्रसिद्ध झाले. सर्वात प्रथम प्रयोग जर्मनीतील स्तेफान किंमेल यांनी केला. कॉर्डलेस फोनच्या बेस युनिटमधून बाहेर पडणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींचा परिणाम त्यांना जाणून घ्यायचा होता. त्यांना कोणताही परिणाम दिसून आला नाही. असे असतानाही माध्यमातून त्याची विपर्यस्त प्रसिद्धी केली गेली. इतकी की सरतेशेवटी त्यांना असोसिएटेड प्रेसला कळवावे लागले ” ल्ल ’्रल्ल‘ ुी३६ील्ल ४१ ३्रल्ल८ ’्र३३’ी २३४८ि ंल्ल ि३ँी उउऊ स्र्ँील्लेील्लल्ल. अल्ल८३ँ्रल्लॠी’२ी २ं्र ि१ ६१्र३३ील्ल ्र२ ं ’्री”. स्वित्र्झलडमध्ये केलेल्या प्रयोगात एक मोबाइल फोन चक्क मधमाश्यांच्या पोळ्यात ठेवला होता. तो फोन जेव्हा निद्रिस्त होता तेव्हा कोणताही परिणाम मधमाश्यांवर दिसून आला नाही, पण जेव्हा त्या फोनला दुसऱ्या फोनवरून िरग दिली तेव्हा मधमाश्यांचा गूं-गूं आवाजाची तीव्रता वाढली आणि ती जोवर फोन चालू ठेवला, तोवर चालू राहिली. बस, एवढय़ा सुतावरून पुढील स्वर्ग गाठला आहे. या प्रयोगांतील निष्कर्ष नीट योजनाबद्ध केलेल्या प्रयोगांमध्ये नंतर पडताळता आलेले नाहीत. शिवाय मोबाइल थेट मधमाश्यांचा पोळात ठेवल्यावर होणारा हा परिणाम मधमाश्यांचे पोळे लांब असताना कसा काय लागू पडणार? वास्तविक जिथे मोबाइल पोचला नाही, अशी कितीतरी जंगले, माळराने, मोकळ्या जमिनी पृथ्वीवर आहेत. सबंध पृथ्वी जणू मोबाइल फोन्सनी व्यापली आहे आणि मधमाश्यांना पळता भुई (आणि आकाश?)थोडी झाली आहे. परिणामी त्या इहलोक सोडून चालल्यात, असे लेख वाचून वाटू लागते. शिवाय ही सगळी चर्चाच (कॉलोनी कोलॅप्स डीसऑर्डरसंबंधी) ही पाळीव मधमाश्यांच्या बाबतीत आहे. जंगली माश्यांमध्ये अशीच अनवस्था ओढवली आहे का?
मग काय आहे मधमाश्यांच्या ऱ्हासाचे कारण ? त्याला फक्त एक कारण नाही. अनेक कारणे प्रस्तावित आहेत. पण मोबाइल आणि त्यातून पसरणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी त्यात निश्चित नाहीत. प्रस्तावित कारणांची वर्गवारी अमेरिकन सरकारी कृषी विभागाने प्रसृत केलेल्या माहितीनुसार अशी आहे.
मधमाश्यांच्या ऱ्हासाची कारणे चार वर्गात मोडतात. १. जंतूंचा संसर्ग २. परपोशींचा संसर्ग ३. संगोपनातील गोष्टींचा ताण ४. वातावरणातील घटकांचा ताण.
जंतुसंसर्गाच्या बाबतीत नोसेमा जातीची बुरशी आणि इस्राइली पॅरॅलिसिस व्हायरस ही सर्वात प्रबळ कारणे समजली जातात. अमेरिकेतील विद्यापीठे आणि मिलिटरी यांच्या संयुक्त संशोधनात मृत माश्यांच्या शरीरात बरेचदा ही बुरशी किंवा व्हायरस किंवा दोन्ही आढळून आले आहेत.
२. वरोआ जातीच्या परपोशी कीटकांवर किटाळ आहे. कारण बऱ्याचदा या कीटकांचा अतिरिक्त प्रादुर्भाव नष्ट झालेल्या पोळ्यात झालेला दिसतो. या कीटकांच्या माध्यमातून वेगळ्याच विषाणूंचा संसर्ग होतो का आणि हा संसर्ग कारणीभूत असतो का, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
३. मधुमक्षिकापालन करणारे आपल्या पाळीव मधमाश्या परागीभवनासाठी शेतकऱ्यांना भाडय़ाने देतात. सीमित भागात खूप मधमाश्यांची पाळणूक आणि त्यामुळे अन्न कमी मिळून होणारी उपासमार हे टाळण्यासाठी प्रसंगी घडणारा दूरदूरचा प्रवास ही कारणे मधमाश्यांच्या पालन आणि संगोपनातील ताण या सदरात मोडतात. फार थोडय़ा पूर्वजांची ही प्रजा आहे, त्यामुळे त्यांच्यात पुरेशा जीन्समध्ये पुरेसे वैविध्य नाही म्हणूनही विविध आजारांना अधिक बळी पडत असतील असेही मानले जाते.
४. पाण्याची कमतरता, मोठाल्या शेतीमध्ये ठराविक लागवड केल्याने परागांचा एकसाचेपणा, त्यामुळे होणारे कुपोषण (जसे फक्त मकाच खाणारी माणसे यांच्यात ब जीवनसत्त्वाचा एक घटक कमी पडून पेलाग्रा हा आजार होतो.) आणि हेतुत: किंवा अहेतुकपणे कीटकनाशकांचा केलेला वापर, कमी झालेली थंडी ही कारणे वातावरणातील अतिरिक्त ताण या सदरात मोडतात.
मधमाश्यांची संख्या नसíगक चक्राप्रमाणेही घटते-वाढते. अचानक पूर्वीही अनेकदा अशी संख्या रोडावली होती. १९०३, २००० साली ती रोडावली होती याची नोंद आहे आणि ती पुन्हा वाढली. मधमाश्यांची संख्या अचानक रोडावण्याचे याही पूर्वीचे म्हणजे १८८० सालापासूनचे उल्लेख सापडतात. अर्थात पूर्वी त्याची कारणे शोधता आली नव्हती पण आता यावर अग्रक्रमाने अभ्यास चालू आहे. शिवाय ही संख्या काही विशिष्ट विषाणूंच्या संसर्गाने होत असेल तर त्याला पुरून उरणारी मधमाश्यांची प्रजा वाढेल आणि स्थिती पुन्हा पूर्वपदाला येईल अशीही शक्यता आहे. मधमाश्यांतले कुपोषण कमी करण्यासाठी अधिक प्रथिनयुक्त आहारपण तयार केला गेला आहे. त्यांच्यात कुठला जंतुसंसर्ग होतो हे शोधणे सुरू आहे आणि ज्ञात आणि संशयित कारणांच्या आधारे मधुमक्षिका पालकांचे प्रशिक्षणसुद्धा अमेरिकेत केले जात आहे.
मधमाश्यांच्या घटत्या संख्येचे आणि मधुघट रिकामे पडण्यामागचे वास्तव हे असे आहे. मग मोबाइलचा वापर आणि त्यांच्या टॉवर्सची वाढती संख्या यांनाच दोषी धरण्यामागे काय हेतू असू शकेल? ग्लोबल वॉìमग, ढासळते पर्यावरण, वाढते कबरेत्सर्जन, बी टी बियाणे अशा विषयांवर किंवा वाढता िहसाचार, अतिरेकी हल्ले, राजकीय भ्रष्टाचार, गरीब लोकांची उपासमार किंवा टी व्ही, मोबाइल, इंटरनेट या माध्यमांचे आक्रमण, अशा विषयांवर उसासे टाकत निराशेच्या सुरात बोलणे याची फॅशन झाली आहे. काही अप्रिय घडले की माझी आजी ‘कलियुग रे बाबा, कलियुग’ असे म्हणायची. याचाच हा आधुनिक अवतार आहे. वास्तव असे आहे विज्ञानातील ज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीत कधी नव्हते तेवढे सामंजस्य आणि खुलेपणा आज आहे. त्या आधारे करीत असलेल्या प्रगतीनेच एवढय़ा विशाल संख्येच्या मानवजातीचे प्रश्न सुटणार आहेत. मला माहीत आहे की मानवी इतिहासातील सर्वाधिक शांततेच्या काळात मी राहत आहे. मानवाला इतिहासात कधी नव्हती इतकी स्वतंत्रता मी अनुभवत आहे आणि इतिहासात कधीही नव्हते इतके भूक भागलेले लोक माझ्या अवतीभवती आहेत. अवतीभवतीच्या निराशेच्या सुरांत आशेचा विसंवादी स्वर लावायला मला पुरेसे सबळ कारण आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2012 रोजी प्रकाशित
मधुघट रिकामे पडण्यामागचे वास्तव
१४ ऑक्टोबरच्या ‘लोकरंग’ मध्ये राजेंद्र येवलेकर यांचा ‘मधुघटचि रिकामे पडती घरी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखावरील प्रतिक्रिया.. २००६ पासून घटणारी मधमाश्यांची संख्या हा काळजीचा विषय आहे, याबाबत वाद नाही.

First published on: 11-11-2012 at 11:45 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile tower is not the only reason of reducing population of honey bees and birds