१० जुलैच्या पुरवणीत हेमंत राजोपाध्ये यांचा ‘भारतविद्येच्या अंगणातील बोधीवृक्ष’ हा रा. चिं. ढेरे यांच्या संशोधनकार्याचे महत्त्व अधोरेखित करणारा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात त्यांनी ढेरे यांच्या संशोधनाचे महत्त्व नेमके व समर्पकपणे मांडले आहे. ढेरे यांना राजमान्यता मिळाली नाही याची खंत त्यांनी रास्तपणे व्यक्त केली आहे. त्याच्याशी अनेकजण सहमत होतील. पद्मश्री वा तत्सम पुरस्कार जरी त्यांना मिळाले नसले तरी विद्वत्मान्यता मात्र लाभली.
एक स्मरण करून द्यावेसे वाटते. ‘द एशियाटिक सोसायटी, मुंबई’ या ज्ञानगौरव करणाऱ्या संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या कॅम्पबेल सुवर्णपदकाचे ते मानकरी होते. तसेच त्यांच्या संपूर्ण संशोधनकार्याचा गौरव करणारी एशियाटिकची मानद गौरववृत्तीही त्यांना दिली गेली होती. विद्वत्जगतात त्यांच्या कार्याची बूज राखली गेली होती. २०१० आणि २०१२ या वर्षी झालेल्या पुरस्कार सोहोळ्यास प्रत्यक्ष हजर राहून त्यांनी ते पुरस्कार स्वीकारले होते.
– डॉ. मीना वैशंपायन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य संघाने संस्कृत नाटके सादर केलेली नाही..
लोकरंग (२४ जुलै) मधील वसुंधरा पेंडसे-नाईक यांच्यावरील डॉ. मीना वैशंपायन यांचा लेख वाचला. त्यात वसुंधराबाईंच्या कर्तृत्वाचा आलेख लेखिकेने यथायोग्य शब्दांत मांडलेला आहे. एकमेकींच्या मैत्रीबद्दलचा उल्लेखही हृद्य असाच आहे. लेखातील दोन उल्लेखांबाबत थोडेसे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे-
‘अमृतमंथन’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती ही सुहासिनी मुळगांवकर यांची होती. त्यासाठी वसुंधरा पेंडसे-नाईक आणि डॉ. मो. दि. पराडकर यांना पाचारण करण्यात आले होते. संस्कृत भाषेतील मौलिक ग्रंथांवर भाष्य करणारा कार्यक्रम दूरदर्शनवरून सादर करणे हे धाडसी पाऊल होते. ते धाडस सुहासिनीबाईंनी करून हा कार्यक्रम यशस्वी केला. त्या स्वत: संस्कृत भाषा घेऊन एम. ए. (सुवर्णपदकविजेत्या) झालेल्या होत्या. अर्थात, दोन्ही तज्ज्ञांचा विद्वत्तापूर्ण सहभाग हाही तितकाच महत्त्वाचा होता.
दुसरा उल्लेख साहित्य संघातर्फे झालेल्या संस्कृत नाटकांबाबतचा! संघाने संस्कृत नाटकांचे प्रयोग कधीच केले नाहीत. ‘महाश्वेता’, ‘विक्रमोर्वशीय’, ‘मृच्छकटिक’, ‘मुद्राराक्षस’ आणि ‘धाडीला राम तिने का वनी?’ ही मूळ संस्कृत नाटकावर आधारित मराठी नाटकंच संघाने सादर केली. संस्कृत नाटकं सादर करण्याचे संपूर्ण श्रेय हे ‘ब्राह्मणसभा, गिरगांव’ या संस्थेला जाते. प्रभाकरपंत जोशी आणि डॉ. दाजी भाटवडेकर यांच्याकडे त्याचे जनकत्व जाते. याबाबत मुळात लेखिकेच्याच मनात संभ्रम आहे. त्यामुळे त्यांनी ‘नक्की कल्पना’ नसलेले विधान केले आहे.
जाता जाता सहज एक आठवण झाली, ती १९६७ साली झालेल्या ‘नयन तुझे जादूगार’ या पुरुषोत्तम दारव्हेकरलिखित नाटकाची! या नाटकातील नायिकेच्या भूमिकेसाठी (वसुंधराबाईंचे डोळे आणि लांबसडक
केस ही त्या भूमिकेची गरज होती.) वसुंधराबाईंना विचारण्यात आले होते. परंतु तालमी, दौरे हे करण्यासाठी त्यांच्या व्यापातून त्यांना वेळ देणे शक्य नसल्यामुळे त्यांनी नकार दिला असावा. त्यामुळे मराठी रंगभूमी एका देखण्या नायिकेला मुकली. या काही गोष्टी वाचकांपर्यंत योग्य स्वरूपात पोहोचाव्यात म्हणून हा पत्रप्रपंच.
तसेच ‘लोकरंग’ (१२ जून) मधील माझ्या ‘सं. संशयकल्लोळ’ नाटकाच्या शताब्दीनिमित्त प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘शाहूनगरवासी नाटक कंपनीचे गणपतराव जोशी हे फाल्गुनरावची भूमिका करत होते’ असे विधान आहे,
त्याऐवजी ते ‘अश्विनशेटची भूमिका करत होते’ असे पाहिजे.
अरविंद पिळगावकर, मुंबई</strong>

‘जीएसटी’तून महाराष्ट्राला कराचा योग्य वाटा मिळावा!
२४ जुलैच्या ‘लोकरंग’ पुरवणीतील ‘जीएसटी म्हणजे काय रे भाऊ?’ हा सचिन रोहेकर यांचा लेख माहितीपूर्ण होता. मुंबईत विक्रीकरासारखे मोठे उत्पन्न देणारे स्रोत आहेत. त्यामुळेच मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी असे म्हटले जाते. परंतु अशा चांगले उत्पन्न देणाऱ्या करांची पूर्ण वसुली व्हायला अडचणी येत होत्या. असे असले तरीही ‘जीएसटी’सारख्या इतर पर्यायांना आधीही विरोधच होत होता.
ही पाश्र्वभूमी विचारात घेता आता ‘जीएसटी’मुळे उत्पन्न वाढणार असल्याने त्याचे सर्व राज्यांना होणाऱ्या वाटपात महाराष्ट्राला त्यातील योग्य वाटा मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
– सुधाकर भोईटे

ना-प्राणघातक शस्त्रांची वैशिष्टय़े
१७ जुलैच्या पुरवणीतील ‘ना-प्राणघातक शस्त्रे!’ हा सचिन दिवाण यांचा लेख वाचला. या लेखात दोन सुधारणा कराव्या लागतील. १) रबरी गोळी धातूला गुंडाळलेली नसते आणि ती जवळून मारली तरी माणूस मरत नाही. २) फोम (चरबीचा) स्प्रे काढण्यासाठी साधे बेबी ऑइल लागते. त्याने शरीराचा दाह होत नाही.
तसेच फिल्ममध्ये वापरली जाणारी खोटी, पण तंतोतंत मॅकेनिझम व दिसणाऱ्या बंदुका या गोळी सुटल्यावर तितकाच मोठा आवाज व प्रकाश करतात. त्यामुळे जमाव घाबरून पांगू शकतो. यांना काडतूस व दारू असते, परंतु पुढे लोखंडी गोळी नसते.
– श्रीनिवास आगावणे, मुंबई

संत मंडळींचे प्रदेशविशिष्ट संचित
३ जुलैच्या ‘लोकरंग’मधील डॉ. आशुतोष जावडेकर यांचा ‘सेटिंग’ हा लेख वाचला. लेख वाचल्यानंतर असे वाटले की, संत मंडळीही जी. एं.सारखी गूढ, गंभीर आणि त्या- त्या प्रदेशांचं संचित असावीत. कोकणात अशा प्रकारे अतिरिक्त सोशीक आणि त्यातून मानसिक घुसमट व्यक्त होत नाही.
– सुखदेव काळे

भारतीय कुटुंबसंस्थेच्या बळी
३१ जुलैच्या ‘लोकरंग’मधील डॉ. आशुतोष जावडेकर यांचा ‘लंपनची अवघड गोष्ट’ हा लेख वाचला. तीन-चार वर्षांपूर्वी ‘अमलताश’ वाचले. आपल्याकडच्या भारतीय कुटुंबसंस्थेने होतकरू सुप्रिया दीक्षितांवर अन्याय केला असे पुस्तक वाचल्यानंतर तीव्रतेने जाणवले. सुप्रिया दीक्षित यांनी गृहिणी, सखी, सचिव या सर्वच भूमिका निष्ठेने पार पाडल्या. पुस्तक वाचताना त्यांच्याबद्दल सहानुभूतीच वाटत होती. सासू म्हणून इंदिराबाईंचे वागणे समजत असले, तरीही. आपल्याकडील पुरुषप्रधान संस्कृतीने पुरुषांचे फाजील लाड केले आहेत. परंतु आता परिस्थिती बदलते आहे. त्याकाळी स्त्रियांनी परहित जपण्याचा वसाच जणू घेतला होता. खरे तर ‘स्वहित जपावे, पण परहित जाणावे’ हा आदर्श असायला हवा.
– जयश्री काकडे

कॅलिडोस्कोपिक माणसं!
डॉ. जावडेकर यांचा ‘लंपनची अवघड गोष्ट’ हा लेख वाचला. माणसं कॅलिडोस्कोपसारखी प्रत्येकाला वेगवेगळी दिसतात. किंबहुना तशी ती असतातही. एकच व्यक्ती दुसऱ्या भूमिकेत प्रू्णत: वेगळी वागू शकते. एक तरल कवयित्री एका बाजूला प्रेमळ व कर्तबगार आई, तर दुसऱ्या बाजूला कठोर सासूही असू शकते. लग्न झाल्यावरही मुलाने आपल्या कलाने वागावे असे वाटणाऱ्या आया घरोघरी दिसतात. या ठिकाणी असाही निष्कर्ष काढता येईल, की बालपणी लोभस मत्री असलेल्यांच्या संसारातही सुमारे ३० वष्रे लेखन थांबण्याइतपत गंभीर ताणेबाणे येऊ शकतात. त्यामुळे जर सासू-सुनेत जास्त समजूतदार संबंध असते तर प्रकाश नारायण संतांमधील हळुवार, सर्जनशील लेखक लिहिता राहिला असता आणि वाचक त्यांच्या नितांतसुंदर लिखाणाला मुकले नसते.
– माधव सावरगांवकर

आधी कोंबडी की..?
सत्तरच्या दशकात राज कपूर यांनी बनवलेल्या ‘संगम’ या चित्रपटातील ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर, तुम नाराज ना होना, की तुम मेरी जिंदगी हो, की तुम मेरी बंदगी हो.. या गाण्यात दोन वेळा येणाऱ्या ‘की’चा कीस पाडत पत्रलेखक आणि अभिनेते रणजीत बुधकर यांनी नाशिकहून निघणाऱ्या कला व क्रीडा यांना वाहिलेल्या ‘रसरंग’ या साप्ताहिकात ‘आधी आंगडे, मग अपत्य’ या शीर्षकाखाली लेख लिहिला होता. आधी चाल आणि नंतर त्या चालीवर गीत लिहिल्यामुळे काहीही कारण आणि अर्थ नसताना केवळ संगीताची जगा भरण्याकरिता हा ‘की’ टाकावा लागला, असा मुद्दा त्यांनी त्यात सविस्तरपणे मांडला होता. आणि हल्ली (१९७२-७३ सालात) हाच प्रकार गीत-संगीताबाबत चित्रपटसृष्टीत चालत असून गीतकारांना संगीताप्रमाणे चालीवर शब्दरचना करण्याकरिता शब्दांची कसरत करावी लागते आणि मग काहीही अर्थ नसणारे शब्द त्यांना टाकावे लागतात. ही पद्धत चुकीची आहे. आधी शब्द आणि नंतर त्यावर चाल हेच योग्य आहे, असा त्यांच्या त्या लेखाचा एकंदर सूर होता.
या लेखावर नंतर बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ‘रसरंग’च्या सुमारे सात-आठ अंकांत सातत्याने त्यावर चर्चा झडली. या वाद-प्रतिवादात मराठीतील बऱ्याच गीतकार, संगीतकार आणि गायकांनी आपले मत मांडले होते. त्यातील काहींनी ‘आधी गीत व नंतर चाल’, तर काहींनी ‘आधी चाल व नंतर त्यावर शब्दरचना योग्य’ असे म्हटले होते. या लेखाला रणजीत बुधकरांनी ‘आधी आंगडे, मग अपत्य’ असे समर्पक शीर्षक दिले होते. या शीर्षकाअंतर्गत ही चर्चा बरीच रंगली होती. हे सारे आज आठवण्याचे कारण याच विषयावर राहुल रानडे यांचा ‘लोकरंग’ (३ जुलै) मध्ये प्रसिद्ध झालेला ‘आधी कोंबडे की..’ हा लेख! त्यात रानडे यांनी दोन्ही बाजू उदाहरणांसह छान मांडल्या आहेत. मुळात कुठल्याही गीतात शब्द आणि चाल, तद्वतच गायकाचा सूर हे सारे उत्तम प्रकारे जमून येणे महत्त्वाचे आहे. मग चाल आधी असो की नंतर! संपूर्ण गीत हे श्रोत्यांना ऐकण्यास मधुर आणि शब्द भावाभिव्यक्ती करणारे आणि सर्वसामान्य रसिकांनाही समजतील असे हवेत. पूर्वी आधी चाल, मग त्यावर शब्द अशी प्रथा होती. काळानुरूप ती बदलत गेली. सर्वच बदलत चालले. त्यामुळे हेही बदलणे ओघाने आलेच. बदलाचा हा कानोसा आणि त्याचे परिणाम रानडे यांनी या लेखातून उत्तम प्रकारे मांडले आहेत. ‘आधी कोंबडी की आधी अंडे?’ याबद्दल कायम चर्चा होत असतात. त्यातून जुने-नवीन माहीत होते. मागे याच सदरात राहुल रानडे यांनी पाश्र्वसंगीत या विषयावर खूप चांगले लिहिले होते. ते आवडले!
वसंत खेडेकर, बल्लारपूर (जि. चंद्रपूर)

Web Title: Lokrang readers reaction on article
First published on: 07-08-2016 at 01:01 IST