‘‘या भूतलावर जर कुठं स्वर्ग असेल, तर तो इथंच आहे… इथंच आहे… इथंच आहे…’’ काश्मीरबाबतच्या या काव्यपंक्ती सुप्रसिद्ध आहेत; पण तेथून अगदी लहानपणीच विस्थापित होणं भाग पडल्यानंतरही केवळ त्या परिसराबद्दलच नव्हे तर तेथील निसर्ग आणि मुख्य म्हणजे तेथील माणसं यांच्याविषयी कायम प्रेमाची आणि ममत्वाची कोमल भावना मनात रुजून राहण्यासाठी एखाद्यानं उच्च आध्यात्मिक पातळीच गाठलेली असायला हवी.
काश्मीरच्या बारामुल्ला परिसरातील ते निळ्या दाराचं घर त्याच्या मनात सतत रुंजी घालत असतं. ते घर आणि तो परिसर तसंच तिथलं निळं आकाश, पांढरे ढग आणि उंच भरारी घेणारे गरुड. शिवाय, तेथील जिवलग सुहृद या साऱ्याच्या शोधात तो थेट काश्मीरला जाऊन पोचतो… आणि मग सुरू होतो त्याचा काश्मीरशी मुक्त संवाद. हा संवाद केवळ त्याच्यासाठीच नव्हे तर आपल्यासाठीही मनावर सतत ओरखडे उठवत जाणारा असतो. काश्मीर हा त्याच्यासाठी त्याच्या जीवनाचा एक अविभाज्य असा भागच बनून गेलेला आहे. भले त्याला अगदी लहानपणीच काश्मीरमधून बाहेर पडावं लागलेलं असलं तरी! खरं तर आपलं बालपण आपण ज्या परिसरात, ज्या मित्रमैत्रिणींसमवेत घालवलेलं असतं, तो परिसर आणि ते मित्र तुम्हा-आम्हा सर्वांच्याच मनात घर करून बसलेले असतात. पण त्याच्यासाठी काश्मीर ही एक भळभळती जखम आहे. पण त्या जखमेला तो निव्वळ कुरवाळत बसलेला नाही; तर तिचा निचरा होण्यासाठी तो पुन्हा थेट काश्मिरातच जाऊन पोचलेला आहे. त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना तेथून विस्थापित करणाऱ्या कोणाविषयीच त्याच्या मनात ना विखार आहे ना विद्वेष. त्यानं खरं तर त्यांना थेट येशू ख्रिास्ताच्या भूमिकेत जाऊन माफ करून टाकलेलं आहे.
तो म्हणजे सुप्रसिद्ध नाट्यकर्मी आणि कादंबरीकार मानव कौल. काश्मीर सोडावं लागल्यावर पुढे तो जगभ्रमंती सुरू करतो. अशाच एका प्रवासात त्याला एक तरुणी भेटते. हा युवक काश्मिरी आहे, हे कळल्यावर ती त्याला काश्मीरला घेऊन जायची गळ घालते. तो तिला नाव विचारतो. ती सांगते ‘रुही’ आणि त्याला ऐकू येतं ‘रूह’! ते काश्मीरला जातातही. ‘रूह’नं काश्मीरबाबत खूपच वाचन केलेलं असतं. त्यातून मग दहशतवाद्यांचे, अतिरेकी कारवायांचे संदर्भ येत राहतात. पण हे सारे संदर्भ या मुक्त संवादाच्या मागे ‘बॅकड्रॉप’सारखे उभे असतात. तरीही त्यामुळेच मुलायम कवितेच्या पातळीवर जाऊन पोहोचलेल्या या संवादाला वास्तवाचंही परिमाण लाभतं.
काश्मीरमधल्या प्रत्येकाचं काश्मीरशी एक आगळंवेगळं, स्वतंत्र असं नातं असतं, असं लेखक म्हणतो. त्या नात्याचे पदर या सहज संवादातून अलगदपणे उलगडत जातात. खरं तर मानव कौल हाही आपलं काश्मीरशी असलेलं नातं शोधण्यासाठीच तिथं जाऊन पोचला आहे. तसा तो अनेकदा काश्मीरला जात असतो. कधी सोबत ‘रूह’ असते, कधी नसते. पण ती नसतानाही ती असते, असंच त्याचं मन सांगत असतं. त्याच्याबाबत काश्मीरचीही तीच गोष्ट आहे. तो काश्मीरमध्ये नसतानाही, काश्मीर त्याच्या सोबत कसं असतं, ते खरं तर मुळातूनच वाचण्याजोगं आहे. तो म्हणतो, ‘‘मी कादंबरी लिहितो म्हणून मी कायम कल्पनेच्याच जगात वावरत असतो. मात्र, या कल्पनेच्या जगातलं काश्मीर आणि वास्तवातलं काश्मीर यात जमीन-अस्मानाचा फरक पडलेला आहे.’’ कविमनाचा मानव कौल त्यामुळे कमालीचा व्यथित झाला आहे. हे सारं या काश्मीरशी साधलेल्या संवादातून सहजगत्या आपल्यापुढे उलगडत जातं.
खरं तर तो काश्मीरबरोबरच आपल्याशीही बोलत असतो. तो सांगत असतो- ‘‘आजदेखील काश्मीरचं नाव घेताक्षणी माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो तो निळ्या रंगाचा दरवाजा आणि पांढऱ्याशुभ्र भिंती. पाठोपाठ दिसतात गडद निळ्या आकाशातील पांढरेशुभ्र ढग. मग आठवतात सफरचंद, बुखार, कांगडी, कुल्चा आणि अनेक हसरे चेहरे.’’
पण ते काश्मीर आणि आज बातम्यांमधून दिसणारं काश्मीर पूर्णपणे वेगळंच असतं, हेही तो आपल्याला सांगून टाकतो. लेखक म्हणतो, ‘‘माझ्या लहानपणी मी काश्मीरची जी चित्रं मनात साठवून ठेवली होती, ते काश्मीर आणि आता बातम्यांमधून दिसणारं काश्मीर पूर्णपणे वेगळंच होतं. हे काश्मीर म्हणजे कोणती तरी वेगळीच जागा असावी आणि भलत्याच जागेचा हा उल्लेख असावा, अशा प्रकारेच आजही मी काश्मीरविषयीच्या बातम्या बघत असतो.’’
या आत्मसंवादातील एक विलक्षण व्यक्तिचित्र हे मानवच्या वडिलांचं आहे. ते आपल्या कुटुंबीयांना काश्मीरमधून बाहेर काढतात; पण स्वत: मात्र पुढची काही वर्षं तिथंच राहतात. तेव्हा तेथील मुस्लिमांशी त्यांचे जडलेले गहिरे भावबंध आपल्यापुढे खऱ्या अर्थानं काश्मीर उभं करतं. ते सारंच मुळातून वाचायला हवं. तरंच आपल्याला काश्मीर म्हणजे काय, ते थोडंफार समजू शकेल. अन्यथा आपल्यालाही मानव कौलप्रमाणेच आज बातम्यांतून दिसणारं वेगळं काश्मीर बघत राहावं लागेल. अलीकडेच पहेलगाम परिसरात घडलेल्या नृशंस त्याकांडानंतर हे वाचताना मन विदीर्ण होऊन जातं आणि मानव कौलच्या मनात काश्मीरविषयी किती सहृदयतेची भावना वसलेली आहे, त्याचं प्रत्यंतर येतं. त्या साऱ्या भावना तितक्याच समर्थपणे नीता कुलकर्णी यांनी मराठीतून आपल्यापर्यंत पोचवल्या आहेत. त्यांची शब्दकळा ही मानव कौलच्या भावना तसंच वेदनाही आपल्यापर्यंत थेट पोचवत राहते. विशेषत: मानव कौलच्या भावभिन्या काव्यपंक्तींचा हा मुक्त अनुवाद बघा –
डोळ्यासमोर घर कोलमडून पडतं
ते वाचवायला त्याच्या जितक्या जवळ जावं,
तितकं ते जास्तच दूर पडलेलं दिसतं…
‘रूह’,- मानव कौल, अनुवाद : नीता कुलकर्णी, रोहन प्रकाशन, पाने- २००, किंमत- २९५ रुपये.
akolkar.prakash@gmail.com