गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वैवाहिक दर्जासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली असून त्यासंबंधी छाननी सुरू आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत यांनी सोमवारी येथे सांगितले.  मोदी यांनी  बडोदा येथून निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या वैवाहिक दर्जासंबंधी काँग्रेसने मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण विवाहबद्ध असल्याचे मोदी यांनी प्रथमच मान्य केले होते.  त्यानंतर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन मोदी हे वस्तुस्थिती दडवित असल्याची तक्रार केली .त्यानंतर मोदींविरोधात निवडणूक लढविणारे काँग्रेसचे उमेदवार मधुसूदन मिस्त्री यांनीही तक्रार केली होती.

संजय बारू यांचे आरोप निराधार – सीएनआर राव
नैनिताल : पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर कमी प्रमाणात नियंत्रण होते, हा पंतप्रधानांचे माजी मीडिया सल्लागार संजय बारू यांनी पुस्तकात केलेला आरोप निराधार आणि सिंग यांची प्रतिमा मलिन करणारा आहे, असे मत पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार, भारतरत्न प्रा. सीएनआर राव यांनी व्यक्त केले आहे. बारू यांचे पुस्तक प्रकाशित होण्याच्या वेळेवरच प्रा. राव यांनी सवाल उपस्थित केला असून त्यावरून यामागे राजकीय उद्देश दडलेला असल्याचे स्पष्ट होते, असे म्हटले आहे. बारू यांनी केलेले आरोप निराधार आणि पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करणारे आहेत, असे राव यांनी म्हटले आहे.

१९८४ च्या दंगलींवरून जेटली-अमरिंदर शाब्दिक युद्ध
अमृतसर : काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांना १९८४च्या दंगलींप्रकरणी निर्दोष ठरविण्यात आल्याचा मुद्दा भाजपने उचलून धरलेला असतानाच आता याच मुद्दय़ावरून अमृतसर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अमरिंदर सिंग आणि भाजपचे उमेदवार अरुण जेटली यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे.
टायटलर यांच्या बचावासाठी अमरिंदर सरसावल्याने जेटली यांनी त्यांच्यावरच प्रतिहल्ला चढविला आहे. ज्या नेत्याचा दंगलीत हात असल्याचे स्पष्ट झाले आहे त्याला आधीच निर्दोष ठरविण्याचा अमरिंदर प्रयत्न करीत आहेत का, असा सवाल जेटली यांनी केला आहे.

अडवाणींची वेबसाइट  पाकिस्तानातून हॅक
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची अधिकृत वेबसाइट पाकिस्तानातून हॅक करण्यात आली असून त्याच्यावर ‘मुक्त-काश्मीर’ (फ्री काश्मीर) असा संदेश टाकण्यात आला आहे. सदर हॅकरने स्वत:चे नाव मोहम्मद बिलाल असल्याचे स्पष्ट केले असून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असा संदेश वेबसाइटवर टाकला आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे दूत धाडले होते, असा गौप्यस्फोट हुरियतचे नेते गिलानी यांनी अलीकडेच केला होता. त्यानंतर लगेचच वेबसाइट हॅक करण्यात आली आहे.

ठाण्यात महायुतीतून बसपा बाहेर
ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी चुलत भावाची जमीन विकून परस्पर पैसे हडप केल्याचा बदनामीकारक प्रचार शिवसेना-भाजप महायुतीने सुरू केल्यामुळे ठाणे महापालिकेत महायुतीसोबत असलेल्या बसपाच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीप्रणीत लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेना-भाजप महायुती आणि विरोधी पक्षातील काँग्रेस-राष्ट्रवादी लोकशाही आघाडीचे संख्याबळ समसमान
आहे. ठाणे महापालिकेतील महायुतीचा पाठिंबा काढून लोकशाही आघाडी गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विलास कांबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. माझ्यासोबत बसपा नगरसेविका सुशीला यादव आणि भाजपचा एक नगरसेवक आहे, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

तिसऱ्या टप्प्यात संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये वाढ
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टप्यातील अटीतटीच्या लढतींमुळे संवेदनशील मतदान केंद्रांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन ती संख्या आता सुमारे ११०० गेली आहे. रायगड, पालघर आणि भिवंडीत सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे जाहीर करण्यात आली असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाचील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

गोपाळ शेट्टींवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश
मुंबई:उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यावर जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तीन महिन्यांत चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश बोरिवली महानगरदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी पोलिसांना दिला. कांदिवली-पोईसर येथील रहिवासी रिटा दादरकर यांनी केलेल्या खासगी तक्रारीची दखल घेत न्यायालयाने शेट्टी आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्याचा आदेश दिला.पोईसर येथे आपली जमीन असून २००७ मध्ये शेट्टी यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने खोटय़ा कागदपत्रांद्वारे ही जमीन बळकावल्याचा आरोप दादरकर यांनी तक्रारीत केला आहे.