मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये सुरू झालेला राजकीय गोंधळ कायम आहे. संयुक्त जनता दल विधिमंडळ पक्षाने रविवारी नितीश यांचा राजीनामा फेटाळला असून त्यांनाच मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायला सांगितले आहे. नितीश यांनी राजीनामा मागे घ्यायला नकार दिला असला तरी उद्यापर्यंत फेरविचार करणार असल्याचेही सांगितले आहे. सोमवारी विधिमंडळ पक्षाची परत बैठक होणार आहे.
संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल यांचे संयुक्त सरकार बनविण्याची कल्पनाही पुढे आली होती. राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मात्र अशी शक्यता फेटाळली आहे. सुशीलकुमार मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल डी. वाय. पाटील यांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी पुन्हा सत्तेवर दावा केल्यास आमदारांची परेड घ्यायची मागणी केली आहे.
२३९ सदस्यीय बिहार विधानसभेत संयुक्त जनता दलाचे ११७, भाजपचे ९०, राजदचे २१, काँग्रेसचे ४, कम्युनिस्ट पक्षाचा एक आणि सहा अपक्ष असे बलाबल आहे.