ठाणे, उल्हासनगर महापालिका तसेच अंबरनाथ नगरपालिकेच्या पोटनिवडणुकांमध्ये कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवत शिवसेना-भाजप युतीला धक्का दिला. पोटनिवडणुक झालेल्या सर्व प्रभागांमध्ये यापुर्वी आघाडीचे उमेदवार निवडून आले होते. ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवार अक्षय ठाकूर तर मुंब्रा प्रभागात काँग्रेसच्या उमेदवार रेश्मा पाटील विजयी झाल्या आहेत. या निकालांमुळे ठाणे महापालिकेत आघाडी आणि युतीचे बलाबल पुन्हा समान झाल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. उल्हासनगर महापालिका पोटनिवडणूकीत पप्पू कलानी यांचे चिरंजीव ओमी कलानी (राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार) विजयी झाले तर अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार ग्रेसी सिद्धार्थन विजयी झाल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग क्रमांक ५४ (अ) मधून राष्ट्रवादीचे अक्षय ठाकूर, शिवसेनेचे सचिन म्हात्रे आणि अपक्ष गणेश ठाकूर, असे तिघे उमेदवार पोटनिवडणूकीच्या रिंगणात होते. यात राष्ट्रवादीची सरशी झाली.