भारतीय जनता पक्षात सध्या जो ‘नमो नमो तमाशा’ सुरू आहे आणि ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत ते पाहता आणीबाणी पर्वातील व्यक्तिकेंद्रित उद्धटपणाचीच आठवण होते, अशी जहरी टीका करीत ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांनी सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी देत बारमेर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. सिंह यांच्या या बंडखोरीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता असली तरी पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती अमित शहा यांनी जसवंत यांना उमेदवारी नाकारली गेल्याचे समर्थनच केले.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बारमेरमध्ये झालेल्या सभेत जसवंत सिंह यांनी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप केला. जसवंत सिंह म्हणाले की, मी केवळ तत्त्वांसाठी निवडणूक लढवत आहे. भाजपने आपल्यावर अन्याय केला. कालपरवा पक्षात दाखल झालेल्यांना उमेदवारी मिळते, परंतु वर्षांनुवर्षे तत्त्वांसाठी लढणाऱ्यांवर पक्षात अन्याय होतो, अशी भावना जसवंत सिंह यांनी व्यक्त केली. उमेदवारी वाटपात दिसणारा उद्धटपणा आणीबाणीच्या काळातही नव्हता. ‘नमो-नमो’ घोषणा म्हणजे जणू काही तमाशाच आहे. आपल्यावर दुसऱ्यांदा पक्षाने अन्याय केल्याची आठवण करून देत जसवंत सिंह म्हणाले की, मला डावलण्यामागे राजनाथ सिंह हेच आहेत; परंतु या साऱ्या कटकारस्थानामागे वसुंधरा राजे याच आहेत. त्या दोघांनीही मला धोका दिला आहे.
पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी यासंबंधी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशी चर्चा केली.
‘निष्ठावंता’चा लढा!
भाजपमधील आजची लढाई ही निष्ठावंत आणि नवागत यांच्यातील आहे, असा दावा जसवंत सिंह यांनी केला. काँग्रेसमधून आलेल्या नवागतांना उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे ही माझी एकटय़ाची किंवा एकटय़ापुरती लढाई नाही. ही तत्त्वांची लढाई आहे.