ज्या वाजपेयी सरकारने ‘कंदाहार विमान अपहरणा’त ३ दहशतवाद्यांची सुटका केली, तो भाजप दहशतवादाच्या प्रश्नाचा कणखर मानसिकतेने सामना कसा करणार, असा सवाल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. उलट तत्कालीन सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गेल्या काही वर्षांत २२ हजार जणांना आपला जीव गमवावा लागल्याची टीकाही त्यांनी केली.
‘दहशतवादाचा प्रश्न सौम्यपणे हाताळल्याची टीका ते आमच्यावर करतात. पण विमान अपहरणप्रकरणी तर भाजपच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी अपहरणकर्त्यां दहशतवाद्यांपुढे चक्क गुढघे टेकले होते. तुम्हाला काय हवे आहे, असे दहशतवाद्यांना विचारले गेले होते.’ अशी बोचरी टीका राहुल यांनी केली. १९९८ ते २००४ या काळात २२ हजार जणांना जीव गमवावा लागला तर गेल्या दहा वर्षांच्या यूपीए सरकारच्या कारकिर्दीत ८०० जण गेले, अशी तुलना त्यांनी केली.
जसवंत, अतिरेकी आणि पाकिस्तान..
प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांकडून बोलताना अनेकदा चुका होतात. विमान अपहरण प्रकरणी भाजपला कोंडीत पकडू पाहणाऱ्या राहुल यांच्याकडूनही अशीच चूक भाषणाच्या ओघात झाली. तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह अतिरेक्यांना सोडण्यासाठी पाकिस्तानात गेले होते, असा आक्षेप राहुल यांनी नोंदविला. प्रत्यक्षात मात्र जसवंत कंदाहार म्हणजे अफगाणिस्तानात गेले होते.