अत्यंत कमी कालावधीत एकरी सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे कोथिंबीर हे एकमेव पीक असून बाजारपेठेचा अंदाज घेऊन लागवड केल्यास यात हमखास पसे मिळतात असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. एक-दोन वेळेस बाजारपेठेचा फटका सहन करावा लागला तरी पुन्हा चिकाटीने तेच पीक घेतल्यास झालेले नुकसान भरून निघून पुन्हा नफा मिळतो असा अनुभव दरवर्षी कोथिंबीरचे उत्पादन घेणारे शेतकरी आवर्जून सांगतात. साधारणपणे मार्च ते जून महिन्यात कोथिंबिरीची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते व कालावधीत उत्पादित होणाऱ्या कोथिंबिरीलाही बाजारपेठ लाभते. थंडीच्या दिवसात कोथिंबिरीला फारसे महत्त्व नसल्यामुळे त्या कालावधीत भाव चांगले मिळत नाहीत व मालाचा दर्जाही चांगला असत नाही. कोथिंबिरीत ‘अ’ जीवनसत्त्व आहे. त्यामुळे गाजराप्रमाणेच दृष्टिदोष दूर करण्यासाठी कोथिंबिरीचा वापर केला जातो. आहारात जसे मिठाचे महत्त्व आहे त्याच पद्धतीने जेवणातील स्वादासाठी कोथिंबिरीचे महत्त्व आहे. शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी उन्हाळय़ाच्या दिवसात धन्याचा वापर करतात. धने, तुळशीचे बी व खडीसाखर पाण्यात भिजवून खाल्ल्यास शरीरातील उष्णता कमी होते. गुलकंदासारखाच याचा लाभ होतो. धन्याच्या विविध जाती आहेत. गावरान वाई, बदामी धना, इंदोरी धना, गौरी धना अशा जाती आहेत. धना पेरताना किंवा वाफ्यावर टाकताना तो रगडून टाकण्याची प्रथा आहे त्याऐवजी धना रात्रभर भिजवून त्यात औषधी टाकून तो पेरल्यास किंवा वाफ्यावर टाकल्यास १२ दिवसांच्या ऐवजी ८ दिवसातच उगवतो असे जाणकारांचे म्हणणे आहे. ३० ते ४० दिवसांत धना विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध करता येतो. औसा तालुक्यातील मातोळा येथील धनंजय भोसले हे प्रगतशील शेतकरी आहेत. इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्यांनी पदविका प्राप्त केली आहे. नोकरीपेक्षा अत्याधुनिक शेती करण्याकडे त्यांचा कल आहे. दोघा भावात ३० एकर त्यांच्याकडे जमीन आहे. िवधनविहीर व माकणी धरणातील पाणीही त्यांना जमिनीसाठी वापरता येते. गेल्या आठ, दहा वर्षांपासून ते नियमितपणे कोथिंबिरीचे उत्पादन घेतात. दरवर्षी किमान पाच, सात एकर जमीन ते कोथिंबिरीसाठी आरक्षित ठेवतात. साधारण जून महिन्यात दर आठ दिवसाला पाच एकर याप्रमाणे ते कोथिंबिरीचा पेरा करतात. ४० दिवसांत जो भाव येईल त्या भावाने कोथिंबीर काढून रान मोकळे करतात व पुन्हा त्यावर दुसरा पेरा घेतात. साधारणपणे वर्षभरात तीन फेरे घेण्याची त्यांना सवय आहे. तीन फेऱ्यात मिळून किमान एकरी ८० हजार ते १ लाख रुपये नक्की मिळतात. भाव पुरेसा मिळत नाही म्हणून उशीर केल्यास पुढच्या पिकावर परिणाम होतो हा त्यांचा अनुभव असल्यामुळे जसा भाव येईल त्यानुसार माल काढून टाकण्याची त्यांना सवय आहे. गतवर्षी १५ एकरावर एकाच वेळी ऑगस्ट महिन्यात त्यांनी कोथिंबिरीचे उत्पादन घेतले व प्रतिएकर १ लाख त्यांना उत्पादन झाले. त्यानंतर हरभऱ्याच्या पिकातही प्रतिएकर ८ िक्वटल उत्पादन झाले व त्यालाही १० हजार रुपये िक्वटल असा विक्रमी भाव मिळाल्याचे भोसले म्हणाले. सध्या त्यांच्या शेतात कोथिंबिरीची काढणी सुरू आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यानंतर कोथिंबिरीची लागवड पुन्हा केली जाईल. पाऊस चांगला पडला असल्यामुळे उन्हाळय़ात पाण्याचे नियोजन करता येते. बाजारपेठेशी चांगली नाळ बसल्यामुळे कोथिंबिरीचे अर्थशात्र आपल्याला साधले असल्याचे ते म्हणाले. एकाच जमिनीत फार तर दोन ते तीन वष्रे कोथिंबिरीचे पीक घेता येते. त्यानंतर पीकपालट केला पाहिजे व त्यानंतर पुन्हा आपल्याला उत्पादन घेण्यात अडचण येणार नसल्याचे ते म्हणाले. लातूर जिल्हय़ात औसा, निलंगा, चाकूर, लातूर, उदगीर, अहमदपूर अशा विविध तालुक्यात मिळून १० ते १२ हजार हेक्टरवर कोथिंबिरीचे उत्पादन घेणारे शेतकरी असून लातूरची कोथिंबीर थेट नागपूरच्या बाजारपेठेत विकणारे अनेक शेतकरी आहेत. pradeepnanandkar@gmail.com