सध्या सर्वत्र शारदीय नवरात्रौत्सवाची धामधुम पाहायला मिळत आहे. नवरात्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे गरबा-दांडिया आणि दुसरं म्हणजे एकाच विशिष्ट रंगाचे कपडे परिधान केलेल्या व्यक्ती…; कॉलेजपासून ऑफिसपर्यंत आणि ट्रेनपासून ते अगदी प्रत्येक लहान मोठ्या चाळीत नवरात्रीच्या नऊ रंगाचा सर्वत्र पाहायला मिळते. नवरात्र हा स्त्रियांसाठी मनसोक्त आनंद लुटण्याचा सण मानला जातो. या काळात प्रत्येक दिवशी कोणता रंग आहे, त्याचे मेसेजेस अगदी आठवड्याभर आधीपासूनच फिरण्यास सुरुवात होते.

पण हे रंग नेमके कसे ठरवले जातात? हे कोण ठरवतं? दरवर्षी अमूक दिवशी हाच अमूक रंग असणार हे कसं ठरवलं जातं? हे विशिष्ट रंग परिधान करण्यामागचे वैशिष्ट्य नेमके काय असतं? असे अनेक प्रश्न अनेकदा आपल्याला पडलेले असतात. पण आपण कधीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. नवरात्रोत्सव आला की आपण फक्त ज्या दिवशी जो रंग आहे, तो रंग पाहून कपडे खरेदी करुन मोकळे होतो. पण आज मात्र आपण यामागे दडलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
आणखी वाचा : नवरात्रोत्सव ‘नऊ दिवस’च साजरा का होतो?

पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीत विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नाही. तसेच याचा पाप-पुण्य, भविष्य याच्याशी काहीही संबंध नसतो. आपण त्या दिवशी त्या रंगाची वस्त्रे परिधान केली नाहीत तर पाप लागते किंवा देवीचा कोप होतो, असे काहीही नसते. फक्त त्या दिवसाच्या वारावरुन हे रंग ठरवले जातात. आपल्याकडे ग्रंथामधून प्रत्येक वाराला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यावरुनच हे ठरवले जातात. यात एकच गोंधळ असतो तो म्हणजे आपल्याकडे सात वार आहेत. मग जे दोन वार परत येतात, त्यादिवशी त्या रंगाचा ‘सिस्टर कलर’ म्हणजे त्याच्या जवळचा रंग त्या दिवसासाठी निवडला जातो.

यामागचा उद्देश एकच तो म्हणजे आपण सर्वजण एक आहोत, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, यासाठी हे केलं जाते. याचा कुठेही, कोणत्याही ग्रंथात उल्लेख नाही. आपण एकाच रंगाचे कपडे परिधान केले तर आपल्याला सामाजिकदृष्ट्या सुरक्षित वाटते. एकीची आणि समानतेची भावना प्रत्येकात निर्माण व्हावी आणि त्यासोबतच आनंद मिळावा, यासाठी ते केले जाते. कोणीही न सांगता अनेकजण त्या त्या रंगाचे कपडे परिधान करतात.

  • रविवार (१५ ऑक्टोबर) – नारंगी/केशरी रंग

शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. नारंगी हा रंग शांतता, ज्ञानाचे प्रतीक आहे.

नारंगी रंगाचे महत्त्व
हा रंग क्रियाशक्ती, उत्साह, अभिमान आणि भरभराट याचं प्रतिक मानला जातो. हा रंग स्वातंत्र्य दर्शवणारा आहे. हा रंग लाल आणि पिवळ्या रंगाचे मिश्रण आहे. त्यामुळे हा रंग शक्ती, उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे, असे मानले जाते. हा रंगाशी पावित्र्यही जोडलेले आहे.

  • सोमवार (१६ ऑक्टोबर) – पांढरा रंग

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो. तसेच हा रंग निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे.

पांढऱ्या रंगाचे महत्त्व
नव्या गोष्टीची सुरुवात दाखवणारा हा रंग बिनचूकपणा आणि खरेपणा दाखवण्यासाठीही वापरला जातो. साधेपणा आणि सात्विकता या रंगातून दिसते. हा सर्वात शांत रंग मानला जातो. तसेच त्या रंगाला शुद्धतेचे प्रतीकही मानले जाते.

  • मंगळवार (१७ ऑक्टोबर) – लाल रंग

तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. लाल हा रंग आवड, शुभसंकेत आणि रागाचे प्रतीक आहे.

लाल रंगाचे महत्त्व
वैज्ञानिकदृष्ट्या लाल रंग हा शरीराची ऊर्जा प्रभावित करतो. लाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो. लाल रंगाचा वापर धोका आणि सावधपणा दर्शविण्यासाठी केला जातो. लाल रंग हा अतिशय आकर्षक असतो. लाल रंगाचा वापर घरातील सर्व शुभ कार्यासाठी प्रथम केला जातो. कपडे किंवा पूजेची फुले यासाठी लाल रंगाची प्रथम निवड केली जाते. याशिवाय लाल रंगात ऊबेची भावनाही असते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लाल रंग आत्मविश्वास वाढवतो.

आणखी वाचा : नवरात्रोत्सवात अष्टमीला फार महत्त्व का दिले जाते?

  • बुधवार (१८ ऑक्टोबर) – निळा रंग

चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. निळा रंग हा उर्जेचे प्रतीक मानला जातो. विश्वासाचं, श्रद्धेचं, सुस्वभावाचं, आत्मियतेचं प्रतिक म्हणूनही निळ्या रंगाकडे पाहिले जाते.

निळा रंगाचे महत्त्व
निळा रंग हा शांततेचं प्रतीक, शीतलता आणि स्निग्धता दर्शवतो. निळ्या रंगाचा मेंदूवर चांगला प्रभाव पडतो. निळा रंग हा बौद्धिक क्षमता वाढवण्याचेही काम करतो. समुद्र आणि आकाश यामध्ये निळ्या रंगाची अनुभूती मिळते.

  • गुरुवार (१९ ऑक्टोबर) – पिवळा

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी पिवळा रंग परिधान केला जात आहे.

पिवळ्या रंगाचे महत्त्व
प्रत्येक शुभ कार्यासाठी पिवळ्या रंगाचा उपयोग होतो. पिवळा रंग हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करतो. हा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो. मनोविज्ञानातील सगळ्यात शक्तिशाली आणि अवघड अशी पिवळ्या रंगाची ओळख आहे. बौद्धिक विकासासाठी, एकाग्रतेसाठी आणि मानसिक शांततेसाठी पिवळ्या रंगाचे महत्त्व अधिक आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती प्रसन्न, आनंदी दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते.

  • शुक्रवार (२० ऑक्टोबर) – हिरवा

सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो.

हिरव्या रंगाचे महत्त्व
हिरवा रंग हा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून ओळखला जातो. या रंगाचे निसर्गाशी आणि भूमीशी अतूट नाते आहे. या रंगाचे नाते निष्ठा आणि समृद्धीशी आहे, असे मानले जाते. सौभाग्याचे प्रतीक म्हणूनही हिरव्या रंगाची ओळख आहे.

  • शनिवारी (२१ ऑक्टोबर) – राखाडी रंग

सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो.

राखाडी रंगाचे महत्त्व
राखाडी रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे वाईट गोष्टींचा नाश. स्थिरतेचा, सुरक्षिततेचा, कौशल्याचा, शिस्तबद्धतेचा रंग म्हणून याकडे पाहिले जाते.

  • रविवारी (२२ ऑक्टोबर) – जांभळा रंग

आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो.

जांभळ्या रंगाचे महत्त्व
जांभळा रंग हा लाल आणि निळा या रंगाच्या मिश्रणाने तयार झाला आहे. या रंगात निळ्याची स्थिरता आणि लाल रंगाची ऊर्जा दिसून येते. या रंगाचा शरीर, मन बुद्धी आणि आत्मा या साऱ्यांवर खोल प्रभाव पडतो. जांभळा रंग आवडणारे लोक शोधक वृत्तीचे, नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्साही. मानवतावादी, नि:स्वार्थी, शांतताप्रिय, समाधानी, दूरदर्शी असतात, असे मानले जाते.

  • सोमवारी (२३ ऑक्टोबर) – मोरपंखी रंग

नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे.

मोरपंखी रंगाचे महत्त्व
मोरपंखी विशेषता आणि व्यक्तिमत्त्व दर्शवतो. हा रंग महागौरी देवीचा खूप आवडीचा असल्याचे म्हटले जाते. या रंगाच्या नावाप्रमाणेच हा रंग सद्‍भावना, सुंदरता, समृध्दी याचे प्रतीक आहे. हिरव्या आणि निळ्या रंगाच्या मिश्रणाने हा रंग तयार होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही ठिकाणी नवरात्रीचे नऊ रंग हे देवीची नऊ रूपे आणि त्यानुसार ठरवतात. नवरात्रीचे नऊ रंग कसे ठरतात किंवा कुणाच्या सांगण्यानुसार ठरवले जातात याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. हल्ली देवीच्या ९ रूपांची; ९ माळा आणि ९ वेगवेगळ्या रंगाच्या वस्त्रांनी पूजा केली जाते. दरवर्षी नवरात्रीत ९ रंगांची वस्त्रे परिधान करणं हा आताच्या काळात एक ट्रेण्ड झाला आहे. त्यामुळे यंदा नवरात्रीच्या दिवसात तुम्हीही रंगांची उधळण करायला अजिबात विसरु नका.