रायगड किल्ल्यावर आज ३४७ वा शिवराज्याभिषेक सोहळा  मंत्रोच्यार आणि शंखानाद यांच्या गजरात दिमाखात साजरा करण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आल्याने, आज या ठिकाणी मोजक्या लोकांची उपस्थिती होती. मात्र असे जरी असले तरी हा सोहळा अत्यंत थाटात पार पडला.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्यावतीने या सोहळ्याचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आणि कोल्हापुरचे युवराज शहाजी राजे भोसले उपस्थित होते.

या सोहळ्याची सुरवात दुपारी गडपुजनाने झाली. यानंतर शिरकाई देवी पूजन करण्यात आलं. त्या अगोदर सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली होती. पहाटे नगारखाना परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. यानतर राजसदरेवर महाराजांना मानवंदना दिली गेली. सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे यांचे राजसदरेवर आगमन झाले. यानंतर मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या सिहासनारूढ पुतळ्याला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला.  नंतर शिवाजी महाराजांच्या मुर्तीला पंचामृत, सप्तगंगा स्नान घालून विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी शिवआरतीचे पठण करण्यात आले.

दरवर्षी या सोहळ्याला राज्यभरातुन हजारो लोक आवर्जून येत असतात, मात्र करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.