अनेक गुंडांना भाजपात प्रवेश देऊन त्यांना पावन करून घेणारे आणि आम्ही वाल्याचा वाल्मिकी करतो असे समर्थन करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता गुंडांसोबतच विजय मल्ल्यासारख्या कर्जबुडव्याचाही वाल्मिकी करायचे ठरवल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. नितीन गडकरी यांनी विजय मल्ल्याला फ्रॉड म्हणणं योग्य नाही असं म्हटलं आहे. या वक्तव्यातून ते विजय मल्ल्याची पाठराखणच करताना दिसत आहेत असेही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

विजय मल्ल्याने कर्जाचा एक हफ्ता बुडवला म्हणून त्याला फ्रॉड म्हणणं योग्य नाही असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. त्यानंतर आज याच बाबत प्रतिक्रिया देताना प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. अशात आता काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र ट्विट करत गडकरींवर निशाणा साधला आहे. गडकरींची वक्तव्याची बातमीही त्यांनी या संदर्भात ट्विट केली आहे.