अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर बेपत्ता असलेल्या तिच्या दोन बछड्यांचे अखेर गुरुवारी दर्शन झाले. यवतमाळमधील जंगलात अवनी वाघिणीचे दोन्ही बछडे रस्ता ओलांडताना दिसले. पांढरकवड्यातील या वाघिणीला वनखात्याने ‘टी-१’ हे नाव दिले होते. परंतु या परिसरातील ही वाघीण ‘अवनी’याच नावाने ओळखली जाते. १३ जणांच्या मृत्यूसाठी ही वाघिण कारणीभूत ठरली होती. टी-१ वाघिणीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यासाठी २२ सप्टेंबरपासून राज्याच्या वनखात्याने तब्बल २०० लोकांना घेऊन मोहीम सुरू केली. अखेर या वाघिणीला ३ नोव्हेंबर रोजी नवाब शफात अली खानचा मुलगा असगर याने ठार मारले होते. अवनीच्या मृत्यूनंतर तिच्या बछड्याचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे वाघिणीचे बछड्यांना शिकार करण्यास शिकण्यासाठी किमान दोन महिन्यांचा तरी कालावधी लागतो. तोपर्यंत वाघिणीने केलेल्या शिकारीवर आणि तिच्या दुधावर त्यांचेही पोट भरत असते. या वाघिणीने २९ ऑक्टोबरला अखेरची शिकार केली होती. तेव्हापासून तिने एकही शिकार केलेली नव्हती. त्यामुळे तिचे बछडे देखील तेव्हापासूनच उपाशी असावेत, आता तेदेखील वाघिणीच्या पाठोपाठ मृत्यू पावतील की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. अखेर गुरुवारी सकाळी यवतमाळमधील जंगलात त्यांचे दर्शन झाले आहे. यामुळे प्राणीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.