भाजपा हा ओबीसींचाच पक्ष आहे आणि कायम ओबीसींचा पक्ष राहिल असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सर्वाधिक ओबीसी मंत्री भाजपाच्या सरकारमध्ये होते. ओबीसी मंत्रालय स्थापन झालं तेदेखील भाजपाच्याच सरकारमध्ये असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्या काळात ओबीसी मंत्री झाले तेव्हा ते ओबीसी होते म्हणून झाले नाहीत, तर त्यांच्या क्षमतेमुळे ते मंत्री झाले.  एवढंच नाही तर भाजपामध्ये मी माझा एकही गट तयार केला नाही. भाजपाचे सगळे आमदार आमचेच आहेत असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. एवढंच नाही तर पंकजा मुंडे यांच्या पाठिशी कायमच आहे.

पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हे नाराज आहेत त्याबाबत विचारलं असता, देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याशी आम्ही संवाद साधू. पंकजा मुंडे यांना जेव्हा जेव्हा टार्गेट केलं गेलं तेव्हा त्यांच्या बाजूने मी कायमच त्यांच्या बाजूने उभा राहिलो. माझ्या मनात पंकजा मुंडे यांच्याबाबत आदराचीच भावना आहे. आजही आहे, उद्याही राहिल. एकनाथ खडसे यांनी देखील ज्या गोष्टी काल बोलून दाखवल्या त्या त्यांनी मांडायला नको होत्या असंही मत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक झालं नाही असा आरोप करण्यात आला. मात्र या आरोपात काही तथ्य नाही कारण गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचं डिझाईन तयार होण्यात काहीसा वेळ गेला. ते झाल्यानंतर त्या स्मारकाला सिडकोतून निधी देण्यात आला आणि त्याचे वर्क ऑर्डरही आली. उद्धवजींकडे पैसे मागण्याची गरज नाही, त्यांनी स्थगिती दिली असेल तर वेगळी गोष्ट आहे असाही टोला फडणवीस यांनी लगावला. भाजपा सरकारने गोपीनाथ मुंडे यांच्या चांगल्या स्मारकासाठी ४६ कोटींचा निधी मंजूर केला. त्याच्या कामाची सुरुवात होते आहे. एवढंच नाही तर चार महिन्यांपूर्वीच LOA मान्य झाला होता. आचारसंहिता लागू झाली त्यामुळे काम थांबलं. लोकसभा निवडणुकीच्या आधीच स्मारकाचं टेंडर निघालं आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.