मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला विशेष मुलाखत दिली. यावरून आता विरोधक विरुद्ध ठाकरे असा 'सामना' पाहायला मिळत आहे. माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा असं थेट आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलं होतं. त्यानंतर भाजपाचे नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत दुसऱ्या वाहिनीला मुलाखत देऊन दाखवाचं असं म्हणत पलटवार केला आहे. तसंच राज्यात सध्या दोन मुख्यमंत्री असल्याचं म्हणतही त्यांनी टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "महाराष्ट्रात सध्या दोन मुख्यमंत्री आहेत. एक म्हणजे जे मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे म्हणजे जे राज्यभर फिरत आहेत." असं म्हणत पाटील यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टोला लगावला. "सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सातवीच्या मुलालाही निबंध लिहायला सांगितला तर तो लिहिलं. केवळ कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी सरकार जाणार नाही असं ते म्हणतात. परंतु तिघेही भांडत असतात आणि नंतर काहीही झालं नाही असं म्हणतात," असंही ते म्हणाले. "कोंबड झाकून ठेवलं तरी तरी सूर्य उगवायचा राहत नाही. मुख्यमंत्र्यांनी कटूपणा सोडत विरोध आमदरांशी बोलावं आणि पुण्याचीदेखील चिंता केली पाहिजे," असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. चार महिन्यांनी मुलाखत "उद्धव ठाकरे यांनी चार महिन्यांनंतर मुलाखत दिली आहे. त्यामुळे मॅच फक्सिंग झालंच आहे. करोनाच्या परस्थितीनंतर ते माध्यमांच्या समोर आले आहे. हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांनाही मुलाखत द्यावी," असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.