राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस पुन्हा एकदा दुखावला असल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका झाल्यानं महाआघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती. त्यावरूनच काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात असतानाच काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला होता. आता यावरून भाजपानं त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“राज्य सरकारच्या वर्षपूर्तीचा आनंद अजून संपायच्याआत काँग्रेस नेत्यांचे इशारे सुरू झाले,” असं म्हणत भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

काय म्हणाल्या होत्या ठाकूर ?

महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. “आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणं टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे,” असं म्हणत ठाकूर यांनी महाआघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला.