राम मंदिराच्या काम लवकरच सुरू होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराच्या कामाचं भूमिपूजन केलं जाणार आहे. यासाठीसाठी दोन तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. याविषयी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचा नामोल्लेख टाळत टोला लगावला होता. पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून केलेल्या विधानानंतर भाजपानं आक्रमक झाली आहे. “… जर मंदिर बांधून करोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी करोना नष्ट होण्याचं साकड का घातलं?,” असा सवाल भाजपाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शरद पवार यांना केला आहे.

“आम्हाला वाटते की करोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटते की मंदिर बांधून करोना जाईल,” असा टोला अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी मोदी सरकारला सोलापूर येथील दौऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला होता. पवार यांनी केलेल्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांना पूर्ण भान आहे की, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे व नाही. देशातील करोनोचा प्रादुर्भाव संपविण्यासाठी सर्वाधिक उपाययोजना मोदी हे करत आहेत. हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. मंदिर बांधून करोना जाणार नाही याचे निश्चित भान त्यांना आहे, परंतु आपल्या देव दैवतांचा आशिर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. जर मंदिर बांधून व देवाची उपासना करुन करोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे, तर देशभरातील कोरोना जाऊ दे असे साकडे का घातले? त्याचे उत्तर आपल्याकडे आहे काय?,” असा सवाल दरेकर यांनी पवार यांना केला आहे.

“लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत असल्याची जाणीव पंतप्रधान मोदी यांना आहे, म्हणूनच या संकटमय परिस्थितीत मोदी यांनी देशासाठी गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून १ लाख ७० हजार कोटींच्या पॅकेजचा तात्पुरता दिलासा जनतेला दिल्यानंतर २० लाख कोटींचे आत्मनिर्भर पॅकेजमधून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली व देशाला आत्मनिर्भर करण्यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान मोदी करोनाच्या परिस्थितीत पूर्ण संवेदनशील आहेत. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असून, येथे करोना रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या आवश्यकता आहेत. पण दुदैर्वाने त्या होत नाही म्हणून रोज करोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उलटपक्षी विरोधी पक्ष नेते व भाजपा जनतेमध्ये जाऊन व सेवाकार्य करुन करोनाच्या बाबतीत आपली बांधिलकी सांभाळत आहे, याचे भान सर्वांना असले पाहिजे,” असेही दरेकर यांनी नमुद केले.