भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे मानधन द्यावे, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. तसेच पूर ओसरल्यानंतर पुनर्वसनाच्या कामाचे आव्हानही सर्वांसमोर असणार आहे. त्यामुळे भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी आपले एक महिन्याचे मानधन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपाच्या सर्व खासदार, आमदार, महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे मानधन देण्याची सूचना करण्यात आली आहे. ‘भारतीय जनता पार्टी, आपदा कोष’ नावाने आपले चेक किंवा ड्राफ्ट देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुरात लाखो संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यांचे संसार पुन्हा सुव्यवस्थित करण्यासाठी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी @BJP4Maharashtra च्या सर्व लोकप्रतिनिधींनी आपले एका महिन्याचे मानधन द्यावे.#MaharashtraFloods pic.twitter.com/VLdHJvumGg — Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 14, 2019 तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी किमान शंभर रुपये तर कमाल हवे तितके योगदान पक्षाकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा करावे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भाजपा महाराष्ट्र पूरग्रस्त सहाय्यता संयोजक म्हणून माजी प्रदेश संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांची नियुक्ती केली करण्यात आली असून लवकरच समितीची स्थापना करण्यात येणार आहे.