“सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपाला बिहार निवडणूक लढवायची होती, म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते.” असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपावर केला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला काल एक वर्ष पूर्ण झालं. मात्र अद्यापही त्याच्या मृत्यूचं गूढ कायमच आहे. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. कारण, सुशांतची आत्महत्या ही हत्या असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण देखील चांगलंच तापलं होतं. आजही त्याच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी सीबीआय चौकशी सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात होताना दिसत आहे.

या संदर्भात बोलताना नवाब मलिक म्हणला की, “सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत असताना, या प्रकरणाचं ज्या प्रकारे राजकारण झालं आहे, हे लोकांच्या समोर आहे. मुंबई पोलीस रीतसर तपास करत असताना, या घटनेचा एफआयआर बिहारमध्ये दाखल करण्यात आला. मग बिहार सरकारने निर्णय घेऊन हा तपास सीबीआयकडे सोपवला आणि एक वर्ष होऊन देखील याच्यात काय निष्पन्न झालं? या तपासात आत्महत्येशिवाय दुसरं काही आहे का? याबाबत आजपर्यंत सीबीआयकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.”

पुण्यतिथी: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर काय घडलं वर्षभरात?

तसेच, “एकंदरीत सुशात सिंहच्या नावाने बिहारची निवडणूक लढवायची होती, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला बदनाम करून त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी हे सगळं कटकारस्थान रचण्यात आलं होतं. आता एक वर्ष झालं आहे, सीबीआयने आता तरी सांगावं की यामध्ये काय खरं आहे. आत्महत्या आहे की कुणी हत्या केली? याची माहिती सीबीआयने दिली पाहिजे.” अशी मागणी देखील नवाब मलिक यांनी केली आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला?; सीबीआयने दिली माहिती

सीबीआयने या प्रकरणाच्या तपासाबद्दल भाष्य केलं आहे. “अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भातील सीबीआयचा तपास अद्याप सुरूच आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्वच बाबींचा सुक्ष्मपणे तपास केला जात आहे,” असं सीबीआयने म्हटलं आहे.