“लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विजयाची शरद पवार यांनाच खात्री नव्हती. आता शरद पवारांना अजूनही आशा आहे की त्यांचेच सरकार येणार आहे. पण केंद्रातील सत्तेनंतर राज्यातही आपलेच सरकार येणार आहे. पवारांना सांगा आमचे सरकार येणार आहे”, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत कार्यकर्त्यांसमोर केला आहे.

बारामतीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित उद्घाटन झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर हा दावा केला आहे. पाटील म्हणाले, “नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने अशी लढत दिली होती की, मतमोजणीच्या दरम्यान पवार साहेबांना सुप्रिया सुळे जिंकतील याची खात्री नव्हती. लोकसभा निवडणुकीत आपण थोडे मागे पडलो. पण नाउमेद न होता आपण कुठे मागे पडलो याचा अभ्यास केला पाहिजे”, असे आवाहन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

“शरद पवारांना अजूनही आशा आहे की, त्यांचेच सरकार येणार आहे. पण केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर राज्यातही आपलेच सरकार येणार आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान मी बारामतीला वेळ देणार आहे”, असे सांगत “राज्यात आपले सरकार येणार की नाही”, असा प्रश्न पाटील कार्यकर्त्यांना विचारला. चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नाला कार्यकर्त्यांनी होकार दिलानंतर पाटील म्हणाले, “मग हे पवारांना सांगा.”

लोकसभा निवडणुकीत भाजपाने बारामती लोकसभा मतदारसंघात बराच जोर लावला होता. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कांचन कुल यांना उमेदवारी देत भाजपाने शरद पवार यांना घरच्याच मैदानात घेरण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत सुळे यांनी विजय संपादन केला. त्यानंतर भाजपाने बारामतीकडे अधिक लक्ष देण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे.