मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा दिवसेंदिवस अधिकच तापत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आता मराठा आरक्षणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचं आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलं. तसेच, मराठा आरक्षण हा विषय राज्याचा आहे, असे पंतप्रधान मोदींना वाटत आहे, म्हणूनच त्यांची आणि संभाजीराजे छत्रपतींची भेट होऊ शकली नाही, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं. त्यांच्या वक्तव्यावरून आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे.

“मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत – १. मोदींची विषयांची समज फार कमी आहे. २. मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही. ३. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे.” असं सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळेला पत्र पाठवले. पण त्यांनी अद्याप मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही.” असं म्हणत नाराजी व्यक्त केली होती? याबाबत आज पत्रकारपरिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मराठा आरक्षणासाठी भाजपा सर्वोतोपरी प्रयत्न करणार; आंदोलनात एक नागरिक म्हणून सहभागी होणार”

चंद्रकांत पाटील म्हणाले, “संभाजीराजेंनी विविध विषयांवर जेव्हा पंतप्रधान मोदींची भेट मागितली असेल, तेव्हा ती त्यावेळी नक्कीच मिळाली असेल. मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान मोदींच्या हातात नाही. हा विषय राज्यांच्या सूचीमध्ये आहे. मराठा आरक्षणात केंद्राची भूमिका कुठं होती जे ते निभावत आहेत. १०२ व्या घटना दुसरूस्तीनंतर देखील राज्याचा अधिकार आहे हे एकदा न्यायालयाला समजून सांगण्याची भूमिका केंद्राने मान्यच केली आहे. केसमध्ये प्रभावीपणे भूमिका मांडली आहे आणि तरी देखील न्यायलायने दिलेल्या निर्णयावर पुनरविचार याचिका दाखल केली, हे (राज्यसरकार) अद्याप यासंदर्भात चर्चाच करत आहे. रिव्ह्यूयमध्ये अतिशय प्रभावीपणे केंद्र सरकार भूमिका मांडणार आहे. पण ५० टक्केचा अभाव व जात मागास हे सगळे विषय राज्याकडे सोपवलेले आहेत. त्यामळे संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या विषयात पंतप्रधान मोदींना भेटून काय होणार? पण कदाचित कोविडच्या काळात त्यांनी नाही म्हटलं असेल. त्यामुळे संभाजीराजेंनी काय म्हटलं हा विषय माझा नाही, माझं म्हणण असं आहे की, संभाजीराजे, विनायक मेट, राजेंद्र पोडरे, विनोद पाटील असू देत कुठल्याही नावाने जर आंदोलन करणार असतील, मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही त्यात बॅनर, झेंडा, बॅच शिवाय एक नागरिक म्हणून सहभागी होवू ”
तसेच, बीड येथून शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे हे ५ जून रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहेत. त्याबाबतही आज चंद्रकांत पाटील यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली.

“विनायक मेटे ५ तारखेला काढत असलेल्या मोर्चात आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा किंवा बॅच घेऊन सहभागी होणार नाही. पण एक नागरिक म्हणून पक्षातील सर्वजण सहभागी होणार आहोत. मराठा आरक्षण न मिळाल्याने मलमपट्टी होईल अशा योजना केल्या त्यात सारथी होती. मात्र सरकारने सारथीचे वाटोळं केले आहे.” असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.