आयएनएक्स मीडिया प्रकरणात सध्या तिहार तुरुंगात असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी बुधवारी महाराष्ट्रातील राजकीय घडोमोडींवरुन महाविकास आघाडीला महत्वाचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी भाजपावर कठोर शब्दांत टीकाही केली. तुरुंगात असतानाही अनेक ट्विटद्वारे त्यांनी आपले विचार मांडले आहे. कुटुंबियांमार्फत त्यांनी हे ट्विट केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

चिदंबरम म्हणतात, “महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवण्याकरीता सह्यांसाठी पहाटे चार वाजता राष्ट्रपती कार्यालयाला पाचारण करण्यात आले हा या कार्यालयावरील एक प्रकारचा हल्लाच होता. यासाठी सकाळी ९ वाजेपर्यंत वाट का पाहण्यात आली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.”

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला चिदंबरम यांनी तुरुंगातून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी या आघाडीला सरकार चालवताना काही सल्लेही दिले आहेत. त्यांनी म्हटले की, “कृपया तुम्ही प्रत्येकाच्या पक्षहिताला सरकारमध्ये दुय्यम स्थान देत शेतकरी कल्याण, गुंतवणूक, रोजगार, सामाजिक न्याय आणि महिला व बालकल्याण या प्राधान्यक्रमाच्या तिन्ही पक्षांच्या समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्रितपणे काम करा. ७४ वर्षीय चिदंबरम यांनी केंद्रात आघाडीची सरकारं बनवण्यात महत्वाचं योगदान दिलेलं आहे.”


“संसदीय लोकशाहीच्या उत्क्रांतीचे निरीक्षण करणारे लोक अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या, विविधांगी, अनेकवचनी समाजासाठी काम करणाऱ्या राजकीय आघाड्या स्विकारतात. कारण, अशा आघाड्यांमधून राजकीय पक्ष तडजोड करण्यास शिकतात तसेच सामान किमान कार्यक्रमावर सहमतही होतात,” असेही चिदंबरम आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.