कोल्हापूरमध्ये नदी पात्रालगत भागात असलेल्या पूररेषेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार डीपीनुसार बदल करण्यात आले. त्यामुळेच कोल्हापूर आणि सांगलीत महापुराचं थैमान माजलं होतं. या महापुराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सारंग यादवडकर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांवर या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सारंग यादवडकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला.

सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याला कारण आहे ते कोल्हापूरच्या पूररेषेत करण्यात आलेला बदल. निळ्या आणि लाल पूररेषेत डीपीमध्ये बदल करण्यात आला. यासाठी स्थानिक प्रशासन, क्रेडाई या बिल्डर संस्थेतले काहीजण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी पूररेषा नदीच्या आतील भागात घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केल्याने जवळपास १३०० एकर जागेवर मोठ्या प्रमाणावर बांधकामं करण्यात आली. मात्र यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर आला. महापुराचं थैमान सांगली आणि कोल्हापूर दोन्ही ठिकाणी होतं. ज्यामुळे लाखो नागरिकांची घरं पाण्याखाली गेली. या सगळ्या घटनेला स्थानिक प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत असा आरोप यादवडकर यांनी केला.