राज्यात करोनाने थैमान घातला असताना दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत करोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यभरात सोमवारी ५०७१ रुग्णांना उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत सर्वाधिक ४२४२ एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. २९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे १५ दिवसानंतर आज पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे. कोणत्या जिल्ह्यातून किती रुग्ण सोडण्यात आले - मुंबई - ४२४२ (आतापर्यंत एकूण ३९ हजार ९७६) पुणे - ५६८ (आतापर्यंत एकूण ८४३०) नाशिक १०० (आतापर्यंत एकूण २३६५) औरंगाबाद ७५ (आतापर्यंत एकूण १९४५) कोल्हापूर २४ (आतापर्यंत एकूण १०३०) लातूर ११ (आतापर्यंत एकूण ४४४) अकोला २२ (आतापर्यंत एकूण १०४८) नागपूर २९ (आतापर्यंत एकूण ८११) राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४७.२ टक्के आहे. त्यात दिवसंदिवस वाढ होत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.