मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला. पुण्यात अडकलेल्या या विद्यार्थ्यांसोबत अमित ठाकरे यांनी फोनवरुन संवाद साधला होता. यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे या विद्यार्थ्यांना तात्काळ आपल्या घरी पाठवण्यासाठी व्यवस्था केली जावी अशी मागणी केली. उद्धव ठाकरे यांनीदेखील अमित ठाकरे यांना दोन दिवसात यासंबंधी उपाययोजना केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य आणि मनसे अधिकृतने ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “अमित राजसाहेब ठाकरे यांनी पुण्यामध्ये एमपीएससी व इतर स्पर्धा परिक्षांमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाण्याची तात्काळ सोय करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा केली”. यावेळी त्यांनी अमित ठाकरे यांचे आभारही मानले आहेत. “आमच्या अडचणीच्या काळात अमित ठाकरे तात्काळ धावून आले. आम्ही सगळे विद्यार्थी त्यांचे आभार मानतो,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. #punestudents @mnsadhikrut@RajThackeray धन्यवाद मा.अमितसाहेब ठाकरे ! आज मा.अमित राजसाहेब ठाकरे यांनी पुण्यामध्ये एमपीएससी व इतर स्पर्धा परिक्षांमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाण्याची तात्काळ सोय करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा केली #म — Mpsc समन्वय समिती महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) May 6, 2020 महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांसाठी कोरोना टाळेबंदीदरम्यान पुणे येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळगावी सुखरूप परतता यावे, ह्यासाठी मनसे नेते श्री. अमित राज ठाकरे ह्यांचे प्रयत्न. #लढाकोरोनाशी #विद्यार्थ्यांचामनसेआवाज pic.twitter.com/9vhTEI6oAo — MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 7, 2020 काय म्हटलं होतं पत्रात? “महाराष्ट्र शासन कोविड १९ चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध उपाय योजना करते आहे. मात्र या आजाराचा प्रादुर्भाव सामान्य व्यक्तींना झाला तर त्यांनी काय करायचं यावरही काम करण्याची गरज आहे. तुम्ही या करता हेल्पलाईन सुरु केली याची मला पूर्णपणे माहिती आहे. तरीही अनेक नागरिकांना हा आजार झाल्यानंतर काय करावं हे समजत नाही. कुठे जायचं, कुणाला संपर्क करायचा हे माहित नसते. यासंदर्भात आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. उपाचारासंदर्भात अनेक नागरिकांना आमच्याकडे बेड उपलब्ध नाहीत, तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा असे सांगण्यात येत आहे. अशावेळी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मनस्थिती बिकट असते. या परिस्थितीवर मला असे वाटते की, सध्याच्या युगात बहुतांश लोकांकडे अँड्रॉइड मोबाइल आहेत, त्यामुळे आपण जर माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सगळ्या रुग्णालयांना जोडून एक APP तयार केला आणि त्यामध्ये असलेल्या कोविड १९ आणि कोविड १९ शिवाय अन्य आजार असणाऱ्या रुग्णांची माहिती तसेच तिथे उपलब्ध असणाऱ्या बेड्सची माहिती रोजच्या रोज अपडेट केली तर लोकांना ही माहिती मिळणं सोपं जाईल. यामुळे सामान्य लोकांना नाहक होणारा त्रास होणार नाही.”