मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लोकांना लक्षमं दिसली तर अंगावर काढू नका असं आवाहन करताना करोनाचा रुग्ण लवकर आला तर लवकर बरा होतो अशी माहिती दिली. उद्धव ठाकरेंचे ते शब्द ऐकून आपल्याला समाधान वाटलं अशी प्रतिक्रिया गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी दिली आहे. लता मंगेशकर यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “नमस्कार…महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी आणि समस्त ठाकरे परिवार व त्यांचे सर्व सहकारी यांना महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा. आज उद्धवजींनी सांगितले की, या आजारातून वेगवेगळ्या वयोगटातले अनेक लोक बरे होत आहेत, हे ऐकुन समाधान वाटले,” असं लता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. नमस्कार.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी आणि समस्त ठाकरे परिवार व त्यांचे सर्व सहकारी यांना महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा.आज उद्धवजींनी टेलीविज़न वर सांगितले की या आजारातून वेगवेगळ्या वयोगटातले अनेक लोक बरे होत आहेत,हे ऐकुन समाधान वाटले.@OfficeofUT ,@AUThackeray — Lata Mangeshkar (@mangeshkarlata) May 1, 2020 लतादीदींनी अजून एक ट्विट केलं असून शिवछत्रपतींच्या या महाराष्ट्राने अनेक संकटाचा सामना केलेला आहे आणि मला खात्री आहे की या संकटावरही महाराष्ट्र यशस्वी पणे मात करेल आणि तुमच्या नेतृत्वाखाली उतरोत्तर प्रगती करत राहील असं म्हणत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवछत्रपतींच्या या महाराष्ट्राने अनेक संकटाचा सामना केलेला आहे आणि मला खात्री आहे की या संकटावरही महाराष्ट्र यशस्वी पणे मात करेल आणि तुमच्या नेतृत्वाखाली उतरोत्तर प्रगति करत राहील. @OfficeofUT — Lata Mangeshkar (@mangeshkarlata) May 1, 2020 उद्धव ठाकरे यांनीही यावेळी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना लता मंगेशकर यांची एक आठवण सांगितली आहे. “मुख्यमंत्री म्हणून हुतात्म्यांना वंदन करताना मनात आलेल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ठाकरे घराण्याचाही सहभाग होता. हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन धुमधडाक्यात साजरा करण्याचं आधी ठरवलं होतं,पण आता नाईलाज आहे. लतादीदींनी २०१० मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी बीकेसीतील मैदानात 'बहु असोत सुंदर' गाणे गायल्याची आठवण झाली, आज त्याच जागी कोविड रुग्णांसाठी उपचार केंद्र आहे”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.