राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहचली आहे. करोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र आता ही संख्या वाढली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. प्रत्येकाने काळजी घ्यावी, घरी सुरक्षित रहावं. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. ३१ तारखेपर्यंतचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. फेज २ मधून फेज ३ मध्ये जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

४८ वा रुग्ण २२ वर्षांची महिला आहे. ४९ वा रुग्ण ५१ वर्षांचा पुरुष आहे. तो अहमदनगरचा आहे त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री अहमदनगरची आहे अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. १२ तासात चार नवे रुग्ण आढळले आहेत. संसर्ग होण्याचं प्रमाण ५० मध्ये १० आहेत. संसर्ग होऊ नये याची आम्ही दक्षता घेत आहोत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मुंबईची लोकल बंद करणं हा शेवटचा पर्याय असेल. सध्या १२ देश असे आहेत ज्यातून आलेले रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळत आहेत. या १२ देशांना आपण बंदी घातली आहे असंही राजेेश टोपे यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच इतर रुग्णांची प्रकृती चांगली आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. पुणे IT सेक्टरमध्ये १०० टक्के वर्क फ्रॉम होम करण्यात आलं आहे. काल रात्री ऑर्डर इश्यू झाल्या आहेत असंही टोपे यांनी सांगितलं. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार आम्ही महाराष्ट्रात नियमांची अंमलबजावणी करतो आहोत. मुंबई पुणे बससेवा बंद करण्यात आलेली नाही. मात्र लोकांनी कार्यालयात येणं टाळावं. प्रवास टाळावा, फेज थ्रीमध्ये जाण्यापासून आपला बचाव कसा होईल याची काळजी आम्ही घेत आहोत. ट्रेन बंद करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही लोकांनी मात्र ती वेळ आमच्यावर आणू नये असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.