महाराष्ट्रात करोनाचे वाढते रुग्ण चिंतेचा विषय ठरत असून तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. जर महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत राहिले तर संसर्ग फक्त राज्यापुरता मर्यादित राहणार नाही असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. "महाराष्ट्राने आपल्या सीमा बंद केल्या आहेत आणि करोना संसर्ग सीमा ओलांडू शकणार नाही असं काही नाही," असा इशारा राज्याचे करोना संबंधीचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिला आहे. "जर सरकारने योग्य काळजी घेतली नाही आणि लोकांनी सरकारने आखून दिलेल्या नियमांचं पालन केलं नाही तर करोना इतर राज्यांमध्ये फैलावेल तो दिवस दूर नाही," अशा शब्दांत डॉक्टर साळुंखे यांनी गंभीरता सांगितली आहे. सुभाष साळुंखे यांनी यावेळी दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगितलं. "करोना व्हायरस फक्त महाराष्ट्रातच राहणार असा विचार करु नका, करोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पावलं उचचली गेली नाही तर एप्रिल महिन्यात उत्तर आणि ईशान्य भारतात महाराष्ट्रासारखी परिस्थिती असेल," असंही ते म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीवर बोलताना ते म्हणाले की, ही वाढ अचानक झालेली नसून करोनाच्या संक्रमणासाठी अनेक घटक जबाबदार आहेत. "सध्याच्या घडीला व्हायरसचं उत्परिवर्तन इतकं झालेलं नाही की, करोना रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीसाठी त्याला दोष दिला जाऊ शकतो. करोना रुग्णसंख्या वाढ होण्यामागे इतर गोष्टीदेखील कारणीभूत आहेत". "महाराष्ट्रातील लोक जणू काही करोना संपला आहे अशा पद्धतीने विचार करत असून वागण्यातूनही ते दिसत आहे. करोना रुग्णसंख्या वाढीसाठी हा गैरसमजदेखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे," असं डॉक्टर साळुंखे यांनी सांगितलं आहे. राज्यात सोमवारी ८७४४ करोनाबाधित रुग्णांची नोंद मागील काही दिवसांमध्ये दररोज आठ हजारांच्या वर नवीन करोनाबाधित आढळत असून रविवारी ही संख्या ११ हजारांच्या वर पोहचली होती. करोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा करोनाबाधितांचीच संख्या अधिक आढळून येत होती. मात्र सोमवारी अनेक दिवसानंतर दिवसभरातील करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आढळून आली. राज्यात सोमवारी ९ हजार ६८ रूग्ण करोनामुक्त झाले असुन, ८ हजार ७४४ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली. राज्यात सोमवारपर्यंत एकूण ९७ हजार ६३७ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.