जिल्ह्याचा आर्थिक कणा असलेल्या सहकार क्षेत्राची सध्या दयनीय अवस्था आहे. प्रस्थापितांनी सहकाराची पुरती वाट लावली. खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यामुळेच सहकार क्षेत्राला कीड लागली, अशी जोरदार टीका महायुतीचे स्टार प्रचारक तथा खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली.
महायुतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या प्रचारार्थ कळंब येथे शुक्रवारी आयोजित सभेत मुंडे बोलत होते. आमदार ओम राजेिनबाळकर, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, उमेदवार प्रा. गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते. मुंडे म्हणाले की, गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत देऊ केली. ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ असेच काम केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. शेतकऱ्यांना संकटसमयी मदत देण्यात आखडता हात घेणाऱ्या घोटाळेबाज सरकारला सत्तेतून बाहेर काढून त्यांची जागा दाखवून देऊ, असेही ते म्हणाले. गारपिटीमुळे मराठवाडय़ात सर्वाधिक आत्महत्या उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केल्या. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे धाब्यावर बसून करण्यात आले. त्यातच कृषिमंत्री पवार यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी केवळ साडेचार हजार रुपयांची अत्यल्प मदत देण्याचे जाहीर केले. परंतु एकरी १ हजार ७०० रुपयांची मदत दिल्यानंतर त्यात सोयाबीनची एक बॅग तरी येते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्राकडे आम्ही एकादा नाही, तर तीन वेळेस हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली. परंतु आघाडी सरकारने मागणी फेटाळून लावली. अशांना आपण मतदान देणार का, असा प्रश्न मुंडे यांनी या वेळी विचारला.
उस्मानाबाद जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. शरद पवार म्हणतात, दंगे घडविणाऱ्या मोदींना पंतप्रधान कसे करायचे. परंतु त्यांना एकच सवाल आहे की, पवनराजेंचा खून करणाऱ्या डॉ. पद्मसिंह पाटील यांना पक्षाची उमेदवारी तुम्ही दिली, ही गोष्ट येथील जनता खपवून घेणार नाही. मतांच्या जोरावर तुम्हाला धडा शिकविल. भाजपतून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या रोहन देशमुख यांच्यावरही त्यांनी टीका केली. देशमुखांचे सोलापूर सोडून उस्मानाबादेत काय आहे? त्यांची भाजपतून कधीच हकालपट्टी केली. परंतु ते अजूनही आपण भाजपचे आहोत. आमचे नेते मोदी असल्याचा प्रचार करीत आहेत. परंतु त्यावर विश्वास ठेवू नका, त्याला तेथेच आडवा करा, असे ते म्हणाले. सत्तेत आल्यावर एक महिन्यात मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुंडे यांनी या वेळी दिली.
भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, अॅड. मििलद पाटील, संजय िनबाळकर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील, माजी आमदार दयानंद गायकवाड, अजित िपगळे, मिनाज शेख, शिवाजी शेंडगे, गोपाल चोंदे आदी उपस्थित होते.
धनंजय शिंगाडे भाजपत
राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय िशगाडे यांनी मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.