राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक आहेत. त्यांची लुटूपूटूची लढाई ही सरकार वाचवण्यासाठी आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आजच भाजपावर टीका करताना राजू शेट्टी यांनी भाजपाचं आंदोलन म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे अशी टीका केली होती. या टिकेला आता फडणवीस यांनी तशाच तिखट शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक आहेत. त्यांची लुटूपूटूची लढाई ही फक्त सरकार वाचवण्यासाठी आहे. दूध दरवाढीचं समर्थन करताना सध्या मिळणाऱ्या दरातून गायीच्या चाऱ्याचा खर्चही निघत नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला.

सध्याचा काळ हा अडचणीचा काळ आहे. दूध उत्पादक शेतकरी हा दुधाच्या उत्पन्नावर जगतो आहे. ज्यावेळी दुधाचे दर कमी होतात त्यावेळी दर स्थिर करण्यासाठी सरकार अनुदान देतं. सध्या दुधाला मिळणाऱ्या दरात गायीच्या चाऱ्याचा खर्चही निघत नाही. असं असतानाही सरकारकडून कुठलेही अनुदान मिळत नाही हे दुर्दैवी आहे. राजू शेट्टी हे सरकारी आंदोक आहेत. ते सरकारमध्ये आहेत त्यामुळे लुटूपूटूची लढाई लढून सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केलेले दावेही फडणवीस यांनी फेटाळले. बाळासाहेब थोरात यांची माहिती चुकीची आहे. देशात एक ग्रामही दुधाची भुकटी आयात झालेली नाही असा दावा फडणवीस यांनी केला.

राजू शेट्टी यांनी काय म्हटलं होतं?
भाजपा आणि विरोधीपक्ष केवळ सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे. कारण ठोस उपाययोजना केंद्र सरकारनेच केली पाहिजे. आयात थांबवून निर्यातीला अनुदान द्यायला हवं तसंच जीएसटी मागे घेतला पाहिजे. राजू शेट्टी यांनी केलेल्या याच टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.