मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

राज्यशासनाने बेघरांना घरे देण्याची योजना अमलात आणणे सुरू केले असून राज्यातील १२ लाख बेघरांपकी १० लाख बेघरांना २०१९ पर्यंत घरे पुरवली जाणार आहेत. आरोग्यसेवेत अत्याधुनिकता आली असली तरी आजची आरोग्यसेवा सामान्य माणसाच्या खिशाला परवडत नाही. आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजनांमुळे गरीब माणूसही महागडी वैद्यकीय सेवा घेऊ शकतो, त्यामुळे आता ग्रामीण भागातही खासगी वैद्यकीय सेवेत वाढ होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रावर व विशेषत मराठवाडय़ावर दुष्काळाचे मोठे सावट आहे. ३१ डिसेंबरनंतर केंद्राची टीम दुष्काळाच्या पाहणीसाठी येईल. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई व विविध उपाययोजानांसाठी सरकारचे सहकार्य राहील. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आघाडी सरकारच्या काळात जेवढी मदत शेतकऱ्याला करण्यात आली त्याच्या तिप्पट मदत आपल्या सरकारच्या कारकिर्दीत करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. लातूर येथील अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, महिला व बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पुन्हा उजनीच्या पाण्याची मागणी

लातूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण सोडवण्यासाठी उजनीचे पाणी लातूरला मिळावे ही १५ वर्षांपासूनची जुनी मागणी यानिमित्ताने पुढे रेटण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचे खासगी स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी केली.

पालकमंत्री संभाजी पाटील यांनी, गेल्या दोन वर्षांत जलयुक्तच्या माध्यमातून उजनीहून जितके पाणी येईल तितके पाणी याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून निर्माण झाले असल्याचे सांगितले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उजनीचे धरणही माझ्याच खात्याकडे असल्याचा उल्लेख करून मूळ विषय सोडून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या पाणीटंचाईचा उल्लेख केला मात्र उजनीच्या पाण्यावर बोलणे शिताफीने टाळले.