राज्यातील एसटी कर्मचार्‍यांना 4 हजार 849 रूपयांची ऐतिहासिक पगारवाढ दिल्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा फसवी असून कर्मचार्‍यांना अद्यापही या वेतनवाढीचा लाभ मिळालेला नाही. दिवाळीपूर्वी ही वेतनवाढ न मिळाल्यास राज्यातील एसटी कर्मचारीही सरकारला आणि परिवहन मंत्र्यांना दिवाळी गोड साजरी करू देणार नाहीत असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

आझाद मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या उपोषणाला भेट देत त्यांनी पाठिंबा दिला. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, माजी आ.अशोक धात्रक, संघटनेचे सरचिटणीस श्री.हनुमंत ताटे उपस्थित होते.

ज्या-ज्या वेळी सरकार ऐतिहासिक शब्द वापरते तेव्हा तेव्हा फसवणुक होणार हे नक्की असते. ऐतिहासिक कर्जमाफी म्हणून केलेली कर्जमाफी फसवी निघाली, त्याचप्रमाणे रावते यांची ऐतिहासिक पगारवाढीची घोषणाही फसवी निघाली आहे. अद्याप कर्मचार्‍यांना त्याचा लाभ मिळालेला नाही, यामुळे आता मी स्वतः कामगारांच्या खांद्याला खांदा लावून लढा देईन असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

अधिवेशनापूर्वी हा लाभ न मिळाल्यास अधिवेशन चालु देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या संघटनेच्या पाठीमागे आदरणीय शरदचंद्र पवार यांची ताकद उभी असल्याने कर्मचार्‍यांचे प्रश्‍न मार्गी लागेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असं ते म्हणाले आहेत. हे सरकार एसटी महामंडळासह महाराष्ट्राला विकुन टाकायला निघाला आहे. या सरकारला उलथून टाकण्याची गरज असून, एस.टी. कर्मचार्‍यांनीच सरकारची घंटी वाजवण्याची वेळ आली असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.