कोणाला तरी खूश करण्यासाठी अंधश्रद्धा विधेयक आणू नका अन्यथा २०१४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असा इशारा नरेंद्र महाराज यांनी दिला. ते अलिबाग इथे पत्रकारांशी बोलत होते. समाजातील अंधश्रद्धा दूर झाल्याच पाहिजेत. मात्र अंधश्रद्धा दूर करताना श्रद्धा मारली जायला नको, कारण मनातील श्रद्धा नष्ट झाली तर समाजातील माणूस पशू बनेल, असेही नरेंद्र महाराज यांनी सांगितले. अंधश्रद्धा विधेयकाच्या नावाखाली हिंदू धर्मावर आघात केले जात आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला माझा विरोध नाही, मात्र कायदा आणताना केवळ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मतेच लक्षात घेऊन चालणार नाही. आमच्या सारख्या धर्मगुरूंशी चर्चा केली पाहिजे. आमची मते अजमावून पाहिली पाहिजेत. अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकात काही सुधारणा केल्या पाहिजेत, असे मतही नरेंद्र महाराज यांनी व्यक्त केले. कोणाला तरी खूश करण्यासाठी जर हे विधेयक आणले गेले तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला येणाऱ्या २०१४ च्या निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.विज्ञान अणि अध्यात्म या जीवनाच्या दोन बाजू आहेत. विज्ञान माणसाला स्थैर्य देते, तर अध्यात्म माणसाला सुसंस्कृत बनवते. प्रगतीसाठी विज्ञान हवे असते तर समाधानासाठी अध्यात्माची गरज असते. दोघांची योग्य सांगड घातली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले. मानवी जीवनातील नीतिमूल्य संपल्यामुळे देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे लोकांना आता नीतिमूल्यांचे शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे शिक्षण देण्यासाठी संस्था सुरू करण्याची परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणी नरेंद्र महाराज यांनी केली.