महाराष्ट्रात घरपोच दारु देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर आमदार नितेश राणे यांनी टीका केली. घरपोच दारू नकोच. याऊलट सरकारने येणाऱ्या शिव जयंतीपासून म्हणजेच १९ फेब्रुवारीपासून राज्यात ड्राय डे घोषित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

घरपोच दारुची सुविधा देण्याच्या निर्णयाववर नितेश राणे यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, घरपोच दारू नकोच. येणाऱ्या शिव जयंती पासून १९ फेब ” dry day” घोषीत करा.शिव छत्रपतींचे आशीर्वाद नक्कीच भेटतील बावनकुळे साहेब.राज्यात शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रम तारखेनुसार पार पडतो. तर शिवसेना दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते.

दरम्यान, मद्यप्राशन करुन वाहन चालवल्याने होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने घरपोच दारुची सुविधा सुरु करण्याचा विचार सुरु होता. यासंदर्भातील वृत्त प्रकाशित होताच सरकारवर टीकेची झोड उठली. समाजसेवी संघटना तसेच वैद्यकीय क्षेत्रातूनही या निर्णयाचा विरोध करण्यात आला. शिवसेनेसह अन्य पक्षांनीही सरकारवर टीका केली. घरपोच दारुची सुविधा देण्याऐवजी दुष्काळग्रस्तांना मदत करा, असे शिवसेनेने म्हटले होते. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. अशा स्वरुपाचा कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही आणि घेणारही नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.