ज्यांनी आपली बदनामी केली ते अजून विद्यार्थी दशेत असून मी या शाळेचा मुख्याध्यापक आहे, असा टोला महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर काही दिवसांपासून आरोप करणाऱ्यांना लावला. अंजली दमानिया यांना शिवसेनेचे पदाधिकारी सोबत घेऊन फिरले. त्यामुळे यामागे कोण असणार, असा प्रश्न उपस्थित करून खडसे यांनी आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे जाहीर केले.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या व्दितीय वर्षपूर्तीनिमित्त येथील सुभाष चौकात शुक्रवारी रात्री भाजपची जाहीर सभा झाली. खडसे यांनी आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिले. एखादी ताकदवान व्यक्ती कुस्तीमध्ये हरत नसल्यास त्याला हरविण्यासाठी युद्धनीतीऐवजी शकुनी नीतीचा वापर केला जातो. निवडणुकीत जे मला हरवू शकले नाहीत त्यांनी बदनामी करण्याची मोहीम सुरू केली आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी हे सर्व आरोप केले जात आहेत. पुढील काळात अजूनही आरोप होतील याची आपणास जाणीव आहे. अशा आरोपांनी नाथाभाऊ खचणार नाही आणि संपणारही नाही. आपण कोणत्याच प्रकरणात कधी लाच घेतली नाही. आपले जर दाऊदशी संबंध असते, तर आरोप करणाऱ्यांचे काय झाले असते, असेही नमूद केले.