अकोले : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी राज्यात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली.

केंद्र सरकारच्या या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन गेले चार दिवस बसले आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करण्याची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिली आहे.

संघर्ष समितीच्या या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांना बरोबर घेत ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चे काढून ठिकठिकाणी रास्ता रोको करून शेतकऱ्यांचे हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

बैठकीत शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, सीमा कुलकर्णी, सुभाष लोमटे, डॉ. अजित नवले यांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी संघटना व समाजसेवी संघटनांचे व्यासपीठ असलेल्या जनसंघटनांच्या समन्वय समितीची ऑनलाइन बैठक विश्वास उटगी यांच्या पुढाकाराने संपन्न होऊन या समितीनेही ३ डिसेंबरच्या राज्यातील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले.

कोल्हापुरात शेतकरी आंदोलनावेळी संघर्ष

कोल्हापूर : नवी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनावेळी राजू शेट्टी यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून संतप्त कार्यकर्त्यांची पोलिसांबरोबर झटापट झाली. या वेळी शेट्टी यांनी केंद्र शासनावर टीकेची झोड उठवली.  राजधानीतील शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचे आयोजन केले होते. एका वाहनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतीकात्मक पुतळा आणला होता. तो पोलिसांनी ताब्यात घेतला. या वेळी पोलिसांनी राजू शेट्टी यांना पकडून ओढत नेल्याच्या आरोपावरून संतप्त कार्यकर्त्यांची पोलिसांबरोबर झटापट झाली.