विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व अहमदनगर लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी उत्सुक असलेले त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे या दोघांनी आज, शनिवारी पुन्हा मतदारसंघातील निवडक पदाधिकाऱ्यांकडून शहराजवळील विळद घाटातील विखे फौंडेशन संस्थेच्या कार्यालयात उमेदवारीचा तालुकानिहाय आढावा घेतला, या बैठकीतील निर्णय दोन दिवसांत जाहीर केला जाईल, असे डॉ. विखे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले.

दरम्यान डॉ. सुजय विखे यांनी काल, शुक्रवारी जखणगाव (ता. नगर) येथील सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसकडे मतदारसंघात उमेदवार नसतांनाही आणि राजकीय द्वेषापेक्षाही विखे घराण्याचा द्वेष अधिक असल्यानेच नगरच्या जागेचा तिढा कायम ठेवण्यात आल्याचा आरोप करत वडिलांच्या राजकारणात अडचण येवू नये म्हणून मी थांबलो, परंतु वडिलांचा मानसन्मान जेथे होईल तेथे आम्ही जाऊ. चिन्ह कोणतेही असो निवडणूक लढवणारच, असे स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने नगर मतदारसंघाचा दिल्लीवरूनच काय पण कोणताही सव्‍‌र्हे करू द्या, त्यानुसार आपल्यालाच उमेदवारी देणे गरजेचे आहे. परंतु राजकीय द्वेषापेक्षा विखे घराण्याचा द्वेष अधिक असल्याने या जागेचा तिढा कायम ठेवण्यात आला आहे. मी मागील तीन वर्षांपासून मतदारसंघात जनतेचे प्रश्न सोडवत आहे. जनतेच्या पाठबळावरच नगरची जागा लढविणार आहे.