भाजपाला मराठाड्यामध्ये मोठा धक्का बसला असून पक्षाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपण पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि प्रदेश कार्यसमितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं पत्र गायकवाड यांनी राज्यातील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवलं आहे. गेली बारा वर्षे मी भाजप नेत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यांनी मला कोणतीही जबाबदारी दिली नाही व जवळही केले नाही. राज्यातून औरंगाबादमध्ये येणारे नेते माझ्या घरासमोरून जात होते पण मला कोणीही साधे बैठकीला बोलावत नसतं. त्यामुळे पक्षात राहून काय करू, असा प्रश्न असे राजीनामा दिल्यानंतर गायकवाड लोकसत्ताशी बोलताना म्हणाले आहेत. इतकच नाही तर भाजपा हा उन्मादी पक्ष असून पदवीधर निवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवाराला हरवण्यासाठी काम करणार असल्याचे गायकवाड म्हणाले.

दरम्यान, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत दाखल केलेला अर्ज गायकवाड यांनी मंगळवारी मागे घेतला आहे. “भाजप हा उन्मादी पक्ष आहे. त्या पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार असून राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे भाजपचा पराभव करू शकतील म्हणून त्यांच्या मागे कार्यकर्ते उभे करू,” असे गायकवाड म्हणाले.
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासमवेत जयसिंगराव यांनी काम केले होते. रामदासांचे श्लोक म्हणत त्यांनी भाजपचा प्रचार केला होता.

गेल्या काही वर्षांत गायकवाड विजनवासात होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी युती तुटली तर उमेदवार असावा म्हणून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर गायकवाड यांचे नाव पुन्हा चर्चेत आले. भाजपच्या जाहिर कार्यक्रमात फारसे न दिसणारे जयसिंगराव गायकवाड यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा मतांच्या ध्रुवीकरणाचा भाग आहे, असे मानले जात आहे. मागील दहा वर्षांपासून सातत्याने पक्षाकडून मला डावललं जात होतं त्यामुळेच मी निराश होतो. अखेर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं पाटील यांनी स्पष्ट केल्याचं एएनआयने म्हटलं आहे.

“मी जयसिंगराव गायकवाड पाटील, भाजपाच्या कार्यसमिती सदस्यत्वाचा व प्राथमिक सदसत्यत्वाचा राजीनामा देत आहे,” एवढा एका ओळीचा राजीनामा गायकवाड यांनी चंद्रकांत पाटील यांना पाठवला आहे. गायकवाड हे भारत सरकारमध्ये केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री होते. त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. याशिवाय ते मराठवाडा पदवीधर मतदारसंघामधून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते तर तीन वेळा बीडचे खासदार राहिले आहेत.

पदवीधर निवडणूक चुसशीची होणार

मराठवाड्यामध्ये पदवीधर निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच गायकवाड यांच्या राजीनाम्यामुळे भाजपचे पदवीधर मतदारसंघासाठीचे उमेदवार शिरीष बोराळकरांपुढील अडचणी वाढल्या आहेत. गायकवाड हे मागील अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील प्रमुख स्थानिक नेत्यांपैकी एक आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर गायकवाड यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्याने बोराळकरांपुढील वाट बिकट झाली आहे. गेल्या वेळी निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे विस्कळीत झालेल्या प्रचार यंत्रणेमुळे शिरीष बोराळकर यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळेच आता बोराळकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांच्यावर पडली आहे. गायकवाड यांच्या राजीनाम्यामुळे पदवीधरची निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.