राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर आज निकाल जाहीर होत आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर वेगवेगळे कौल हाती येऊ लागले आहेत. तर अनेक ग्रामपंचायतीचं निकालही लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरली होती. निवडणूक निकालात इतर पक्षांची घौडदौड सुरू असताना मनसेला दिलासा देणारे निकाल समोर आले आहेत.

अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मनसेनं शिवसेना-भाजपा युतीला धूळ चारत विजय संपादीत केला आहे. काकोळी ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली. यात मनसेनं युतीच्या उमेदवारांचा पराभव करत ग्रामपंचायतीवर कब्जा केला.

आणखी वाचा- राम शिंदेंना रोहित पवार पुन्हा पडले भारी; चौंडीत राष्ट्रवादीनं उधळला गुलाल

ग्रामपंचायतीत मनसेचा नगरसेवक विराजमान होणार असून, ७ पैकी ४ जागा पक्षानं जिंकल्या आहेत. सर्व विजय उमेदवारांचं पक्षाच्या वतीनं अभिनंदनही करण्यात आलं आहे. “आपले ‘मनसे’ अभिनंदन! घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अंबरनाथ मधील काकोळी ग्रामपंचायत मधील ०७ पैकी ०४ सदस्य विजयी!,” अशा शब्दात मनसेनं नवनिर्वाचित सदस्यांचं अभिनंदन केलं आहे.

आपले ‘मनसे’ अभिनंदन!

घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अंबरनाथ मधील काकोळी ग्रामपंचायत मधील ०७ पैकी ०४ सदस्य विजयी! #RajThackeray #MNS #मनसेवृत्तांत

Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Sunday, 17 January 2021

 

त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात असलेल्या शिरपूर ग्रामपंचायतीतही मनसेनं दणदणीत विजय मिळवला आहे. ७ जागांपैकी ६ जागा मनसेनं जिंकल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील खैरी सावंगी वाढोणा ग्रुप ग्रामपंचायतीमध्येही मनसेनं एकहाती विजय मिळवला आहे. पक्षानं ७ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत.

आणखी वाचा- Gram Panchayat Results : सांगलीत जयंत पाटलांचे मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे, मेव्हण्यांची पत्नी अन् मुलगी सारेच हरले

निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे -१४३, पालघर- ३, रायगड- ७८, रत्नागिरी- ३६०, सिंधुदुर्ग- ६६, नाशिक -५६५, धुळे -१८२, जळगाव -६८७, नंदुरबार- ६४, नगर -७०५, पुणे -६४९, सोलापूर- ५९३, सातारा- ६५२, सांगली- १४२, कोल्हापूर- ३८६, औरंगाबाद- ५७९, बीड- १११, नांदेड- १०१३, परभणी- ४९८, उस्मानाबाद- ३८२, जालना- ४४६, लातूर- ३८३, हिंगोली- ४२१, अमरावती- ५३७, अकोला- २१४, यवतमाळ- ९२५, वाशीम- १५२, बुलढाणा- ४९८, नागपूर- १२७, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६०४, भंडारा- १४५, गोंदिया- १८१, गडचिरोली- १७०.