मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या जामीन याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात २९ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा कट साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी इतर काही व्यक्तींसोबत रचला होता, असा आरोप आहे. या स्फोटामध्ये सहा जणांचा बळी गेला होता. २३ ऑक्टोबर २००८ रोजी साध्वी ठाकूर यांना अटक करण्यात आली होती.
स्पॉंडिलायटिस आणि इतर काही व्याधींमुळे रुग्णालयात उपचार घेणे आवश्यक असल्याने त्यांनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. साध्वी ठाकूर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ऑक्टोबर २०१२ पासून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर लवकर सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकूर यांचे वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयात केली.