ठाकरे सरकार करोना संकट हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी केली आहे. आज नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली त्या दरम्यान त्यांनी ही मागणी केली आहे. करोना संकटाचा सामना करण्यास ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी आता राणे यांनी केली आहे.

आणखी काय म्हटलं आहे नारायण राणे यांनी ?
राज्य कसे चालवावे, पोलीस यंत्रणा कशी हाताळावी, हे अद्याप मुख्यमंत्र्यांना जमत नाही. मनपा वर राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. ही सर्व रुग्णालयं लष्कराच्या ताब्यात द्यावीत तरच परिस्थिती सुधारु शकते अशीही विनंती राणे यांनी राज्यपालांकडे केली. आत्तापर्यंत राज्याला जे काही मिळालं ते केंद्राकडूनच मिळालं. राज्यानं काय दिलं? त्यांचं धोरण काय? सरकारी अधिकाऱ्यांना, पोलिसांना कसं हाताळावं, त्यांना सुरक्षित कसं ठेवावं याचा काहीही अभ्यास नाही. राज्यात सगळा अनागोंदी कारभार सुरु आहे असंही नारायण राणेंनी राज्यपालांना सांगितलं.