यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन दिवसांत तब्बल ६१ करोनाबाधितांची वाढ झाली असून, प्रशासनासोबत नागरिकांचीही चिंता वाढली आहे. आज रविवारी सर्वाधिक २५ रूग्णांची वाढ झाली असून, शनिवारी २० तर शुक्रवारी १६ रूग्ण आढळले होते. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात १३३ अॅक्टिव्ह करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतची रूग्णसंख्या ४४२ इतकी झाली.

रविवारी पॉझटिव्ह आढळलेल्या २५ रूग्णांपैकी १९ जणांचे नमूने प्रयोगशाळेत तर सहा जण ‘रॅपिड ॲन्टीजन टेस्ट’द्वारे पॉझिटिव्ह आढळले. यात १२ पुरूष आणि १३ महिलांचा समावेश आहे. यातील यवतमाळ शहरातील तिरुपती नगर येथील एक पुरुष व दोन महिला, छत्रपती नगर येथील एक पुरुष व एक महिला, दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील एक महिला, दारव्हा येथील दोन पुरुष, एक महिला, पुसद शहरातील पार्वती नगर येथील एक महिला, गांधी वॉर्ड येथील दोन पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील विठ्ठल नगर येथील एक पुरुष, नेर शहरातील राम मंदीर परिसरातील एक महिला, वणी येथील एक महिला, उमरखेड येथील तीन पुरुष व तीन महिला, पांढरकवडा शहरातील शास्त्री वॉर्डातील एक पुरुष आणि महागाव येथील एक पुरुष पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दरम्यान उपचार सुरू असलेल्या ११ जणांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रविवारी नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये १२ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या ४४२ रूग्णांपैकी २९६ रूग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात करोनामुळे १३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आतापर्यंत ७ हजार ४ नमूने तपासणासाठी पाठविले असून, यापैकी सहा हजार ९११ अहवाल प्राप्त झाले. तर ९३ संशयितांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. ६ हजार ४६९ संशयितांचे अहवाल आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत.