महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या दोन दिवसांच्या लातूरमध्ये झालेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजनात, सहभागात, कार्यक्रमात किती झपाटय़ाने बदल होतो आहे हे पाहून अनेकांनी अशी अधिवेशने हवीतच कशाला, असा प्रश्न उपस्थित केला. प्रत्येक संघटनेत अधिवेशन हा सोपस्कार असतो. यानिमित्ताने सर्वाचे प्रश्न सामूहिकतेने चर्चिले जातात व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडण्यास मदत होते. ग्रंथालय संघाच्या समस्या अतिशय बिकट आहेत. एकीकडे वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू केला जातो तर दुसरीकडे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या कामगारांइतकेही पसे मिळत नाहीत. गेल्या १६ वर्षांत त्यांच्या अनुदानात वाढ नाही. त्यांचे प्रश्न उपेक्षितच राहिले आहेत. या अधिवेशनाला पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थिती राहील असा अंदाज होता. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी उद्घाटनाची जबाबदारी पार पाडली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विविध संघटनांचे लातुरात वार्षकि अधिवेशन ठरलेले असायचे. स्वागताध्यक्ष दिलीपराव देशमुख अन् उद्घाटक विलासराव देशमुख असा तेव्हा पायंडा होता. दिलीपराव देशमुखांच्या स्वागताध्यक्षपदामुळे अधिवेशनाच्या भौतिक सुविधा मार्गी लागायच्या व विलासराव देशमुखांच्या उपस्थितीमुळे आíथक प्रश्न मार्गी लागायचे. गेल्या काही वर्षांत लातुरात राज्यस्तरीय अधिवेशन ग्रंथालय संघाच्या वतीने दिमाखदार घेण्यात आले. अॅड. त्र्यंबकदास झंवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगली मेहनत घेतली होती. अधिवेशनाला देवेंद्र फडणवीस उद्घाटक म्हणून निश्चित होणार असल्यामुळे स्वागताध्यक्षपद बदलत्या काळानुसार विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक डॉ. अशोकराव कुकडे यांच्याकडे चालून आले. लातुरात अधिवेशनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम म्हणजे श्रोत्यांसाठी पूर्वी मेजवानी असे. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, शिवराज पाटील चाकूरकर हे कार्यक्रम रंगवत असत. आता काळ बदलला व उद्घाटन उरकण्याचा कार्यक्रम पार पडला. ग्रंथालयाच्या समस्या प्रास्ताविकातून मांडण्यात आल्या. या समस्या रास्त आहेत, त्या सोडवल्या पाहिजेत अशी भूमिका स्वागताध्यक्षांनी मांडली अन् पालकमंत्र्यांनी दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांच्या समवेत बठक घेऊन तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावेन, असे आश्वासन दिले. जणू काही केवळ मागण्या मान्य व्हाव्यात एवढा एकच प्रश्न महत्त्वाचा असल्यासारखे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. काँग्रेसच्या मंडळींनी उद्घाटनाच्या कार्यक्रमावर जणू अघोषित बहिष्कारच टाकला होता. उद्घाटनाच्या सत्रात पालकमंत्री निलंगेकर यांनी स्थानिक व्यापाऱ्यांचा एलबीटीचा प्रश्न सोडवला यासाठी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम उरकून घेतला. ते व्यासपीठ कशासाठी होते व त्याचा वापर कोणत्या कारणासाठी होतो याला कोणीही हरकत घेतली नाही. उद्घाटन कार्यक्रमानंतर दिवसभरात दोन परिसंवाद होते. मात्र संयोजकांनी दोन परिसंवाद एकत्रितपणे घेण्याचे ठरवले. वाचन संस्कृती, दृकश्राव्य माध्यमे व नियतकालिके या परिसंवादात सारंग दर्शने, दिनेश गुणे, अरुण करमरकर या मुंबई येथील पत्रकारांनी सहभाग दिला. कृषी संस्कृती व वाचन संस्कृती या परिसंवादासाठी प्रा. डॉ. शेषराव मोहिते हे एकमेव वक्ते होते व या दोन्ही परिसंवादाचा अध्यक्षीय समारोप माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केला. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार नसल्याचे कळताच राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांचा विरस झाला व त्यानंतर परिसंवादाकडे अनेकांनी पाठ फिरवली. परिसंवाद रंगत आला तेव्हा आमदार अमित देशमुख व त्यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकत्रे व्यासपीठावर आले. त्यांच्या आगमनामुळे वक्त्याला भाषण आवरते घ्यावे लागले. दोन वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर स्थायी समितीचे सभापती अशोक गोिवदपूरकर व आमदार अमित देशमुख यांची भाषणे झाली. या अधिवेशनाला महापालिकेच्या पूर्वीच्या मंडळींनी १० लाख रुपये मंजूर केले होते व तेव्हा पालिकेत काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे आमदार अमित देशमुख यांना बोलू देण्यास संयोजकांसमोर पर्याय नव्हता. मुख्य कार्यक्रमाच्या वेळी पत्रिकेत नाव असतानाही आमदार अमित देशमुख व त्यांचे कार्यकत्रे उपस्थित राहिले नाहीत व नंतर मात्र त्यांनी भाषणबाजी केली. आपल्या संस्कृतीत जे संकेत पाळले जातात तेच जर पायदळी तुडवले जात असतील तर नवी पिढी संस्कृती कशी जपणार, असा प्रश्न उपस्थित होतो. ज्या ग्रंथालयातून माणूस सुसंस्कृत बनतो असा दावा केला जातो, त्यांच्या ५४ व्या अधिवेशनात संस्कृतीलाच हरताळ फासला जात असेल व अधिवेशन सोपस्कार होणार असेल तर अशा अधिवेशनाचा उपयोग काय? लातूर अधिवेशनातून समाधान घेऊन जाण्याची प्रथा होती. आता मात्र आलेल्या मंडळींना पश्चात्ताप घेऊन जाण्याची पाळी आली. नवसरंजामशाहीची घुसखोरी.. राज्यभरातून आलेल्या मंडळींना स्थानिक राजकारणाशी काहीही देणेघेणे नसते. त्यांच्या अपेक्षा, त्यांची बौद्धिक भूक भागवावी व त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न सुटावेत इतकीच असते, मात्र या बाबींकडे लक्ष न देता प्रत्येकानेच आपला अजेंडा राबवला. अमित देशमुखांच्या भाषणानंतर पुन्हा परिसंवादातील तिसऱ्या वक्त्याचे भाषण सुरू झाले व ते भाषण संपण्याअगोदरच अमित देशमुख व त्यांच्या सोबतचा ताफा व्यासपीठावरून खाली निघाला. बोलणाऱ्या वक्त्यांनाही मध्येच थांबवून मी येतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे वक्त्यालाही आपले बोलणे थांबवावे लागले. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विचारमंथन सुरू असताना एकूण नवसरंजामशाही सर्वच क्षेत्रात घुसते आहे याबद्दल खरे चिंतन होण्याची गरज आहे.