CAA, NRC आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये सुमारे २५ ते ३० संघटना सहभागी होतील असा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे.

देशात NRC आणि CAA विरोधात प्रचंड रोष आहे. अनेक राज्यांमध्ये यावरुन आंदोलनं आणि जाळपोळही झाली. सरकारने हा कायदा लागू केला आहे यामागे त्यांची दडपशाही आहे. एकीकडे या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत तर दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे त्यामुळेच आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

नोटबंदी, जीएसटी या निर्णयांमुळे केंद्र सरकाविरोधात निषेधाचं वातावरण तयार झालं. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही बंदचं आवाहन केलं आहे. आमच्या बंदमध्ये २५ ते ३० संघटना सहभागी होतील याचा आम्हाला विश्वास आहे असं प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.