राज्यातल्या करोना आकडेवारीच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण संपूर्णपणे बंद कऱण्याचे आदेश दिल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. म्युकरमायकोसिस आणि करोना या दोन आजारांसंदर्भातल्या आज झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, "जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत त्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण १०० टक्के बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्व बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातल्या कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत." We have decided to stop home isolation for patients of 18 districts where the positivity rate is high. The patients from these districts will have to go to a quarantine center, won't be allowed home isolation: Maharashtra Health Minister pic.twitter.com/09DsGrFuUK — ANI (@ANI) May 25, 2021 राज्यात सध्या सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, बीड, रायगड, पुणे, हिंगोली, अकोला, अमरावती, कोल्हापूर, ठाणे, सांगली, गडचिरोली, वर्धा, नाशिक, अहमदनगर, लातूर हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. आणखी वाचा- आम्ही पैसे देतो, आम्हाला लस खरेदी करून द्या; राजेश टोपेंचं केंद्राला कळकळीचं आवाहन माध्यमांशी बोलताना टोपे यांनी सांगितलं की, सरसकट चाचण्या करणं टाळायला हवं. बाधितांच्या जवळच्या ज्या रुग्णांना सर्वाधिक धोक आहे तसंच ज्यांना कमी धोका आहे, अशांच्याच चाचण्या कऱण्यात याव्यात. जनरल टेस्टिंग टाळून फोकस टेस्टिंगवर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला असून त्याबद्दलच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचं टोपे यांनी सांगितलं. लसींच्या ग्लोबल टेंडरसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "अद्याप कोणत्याही राज्याच्या लसींच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे केंद्राने लसीकरणासंदर्भात राष्ट्रीय धोरण जाहीर करावं."