Maharashtra Weather Updates : पुणे आणि साताऱ्यात सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागातील एका आधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि साताऱ्याशिवाय मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर मंगळवापासून पावसाचा ओघ कमी होईल.

भारतीय हवामान विभागानं २४ तासांत कमीतकमी २०४.५ मिमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या आधिकाऱ्यानं प्रसारमाध्यमांना सांगितलं की, ‘‘पुणे, कोल्हापूर, सतारा आणि सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील सोमवारपासून मुसळधार पावासाचा अंदाज आहे. सातारा आणि पुण्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.’’

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भासर, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा मुक्काम लांबणार आहे. या दोन विभागासह राज्यात इतरत्र २० ते २२ ऑगस्टपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार आहे. कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्याच्या अनेक भागांत ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस आता सरासरीच्या पुढे गेला आहे.

पावसाचा जोर, धरणांतील विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्र आणि कोकणात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे भरली असून त्यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे तेथील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीत कृष्णेच्या वाढत्या पातळीमुळे गतवर्षीच्या पुराच्या स्मृती जाग्या झाल्या असून अनेक गावांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे चिपळूण, राजापूरमध्ये पूरस्थिती असून वाशिष्ठी नदीच्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पश्चिम घाट क्षेत्रामध्ये गेले दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने वारणा, राधानगरी, दूधगंगा, तुळशी, कुंभी, कासारी, उरमोडी, धोम, कण्हेर, तारळी यांसह बहुतेक जलसाठे ओसंडून वाहत आहेत.