राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. तर, मागील काही दिवसांपासून दररोजची करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा कमी आढळून येत आहे. परंतु, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत अद्यापही मोठी वाढ दिसून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ८५० करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर, ५४ हजार ५३५ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ४२ हजार ५८२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ४६,५४,७३१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८८.३४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ७८ हजार ८५७ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०३,५१,३५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२,६९,२९२ (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,०२,६३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,८४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५,३३,२९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात लॉकडाउन १ जूनपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारकडून निर्बंध जाहीर

दरम्यान, करोनाचं संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसल्याने ठाकरे सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी मुख्यमंत्री निर्णय घेत अधिकृत जाहीर करतील अशी माहिती दिली होती. त्याप्रमाणे १ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानेच सध्या लागू असलेले कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.